सातच्या आत

©सौ. प्रतिभा परांजपे
संध्याकाळचे सात वाजले. देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणून नंदा सर्व खोल्यांमध्ये उदबत्ती फिरवत फिरवत बाहेरच्या हॉलमध्ये आली.
अप्पा हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होते.
मधूनच बाहेर बाल्कनीत जाऊन पहात आत येऊन घड्याळ पाहत बडबडले  “सात केव्हाचे वाजून गेले. मनू अजून आली नाही ट्यूशन वरून? आधीच थंडीचे दिवस लहान त्यामुळे बाहेर अंधार किती लवकर पडलाय‌!”
नंदाच्या कानावर अप्पांची बडबड ऐकू येत होती.

“येईल अप्पा, मैत्रिणी आहे बरोबर नका काळजी करू !”आज तिचा एक्स्ट्रा क्लास आहे परिक्षा जवळ आली आहे. बोलली होती मला जाताना.”
एवढ म्हणत नंदाआत गेली तरी आप्पांची बडबड तिला ऐकू येत होती!
“काळजी करू नका काय? मुलीची जात आहे. आज काल काय काय बातम्या ऐकायला येतात.”!
तेवढ्यात मृण्मयी आलेली पाहून अप्पांचा राग जरा शांत झाला.
मनू सरळ मोरीत गेली, तिथून खोलीत. त्यामुळे आप्पांना तिला रागवायला चान्स दिला नाही तिने.

रात्री झोपताना नंदा अशोकला, तिच्या नवर्‍याला म्हणाली, “अप्पा फारच काळजी करतात मनूची.”
“हो त्यांचे खूप प्रेम आहे!’
“हो पण अति काळजी पायी चिडचिड होते रे त्यांची.”
“अग -मनू वयात येते आहे ना म्हणून.”
“हो रे, आपल्यालाही समजते. माझं लक्ष असतं तिच्याकडे ,मी बोलते, विचारते. ती सांगते सर्व दिवसभरातील  घटना पण ते सहजपणे, मुद्दाम खोदून नाही विचारत. पण आप्पा– तिच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवतात असे तिला जाणवते त्यामुळे मग तिची चिडचिड होते.”

“त्याला कारणही तसेच आहे ग.!’
“कारण? काय कारण? मनू काही अडनेड वागते?”
“म्हणून नाही ग ! मागचा अनुभव त्यांना तसं करायला भाग पाडतो. तुला कधी सांगितले नाही.”
“काय ?”
“आप्पांची बहिण होती त्यांच्यापेक्षा मोठी.”
“हो– ऐकून आहे नांव पण, तिच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. का? काय घडलं असं?”

“सुमन नाव होतं तिचं. अप्पांनीच  सांगितले,  एकदा आप्पा तिच्या फोटो पाहून रडत होते तेव्हा मी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले.
बहीण होती रे सुमन ,मोठी माझी. नावाप्रमाणेच नाजूक, सुंदर साधी सरळ.
पण नशीब तेवढं चांगलं नव्हतं रे, तिचं व आमचं.
मी विचारलं कां काय घडलं असं?
तेव्हा अप्पांनी सांगितल– नववीत होती शाळेतून येताना तिला काही मुलं त्रास देत. पण शाळा बंद करतील  या भिती ने  ती घरी काही सांगत नसे, चुपचाप सहन करत राहीली. त्यामुळे त्या मुलांची हिम्मत वाढली. जे नको व्हायला ते झालं.

मला तो दिवस अजून आठवतो अप्पा म्हणाले, सुमन घरी आली  तिची  तीअवस्था पाहून आई तर चक्कर येऊनच पडली.
मी एकटाच घरी आईकडे पाहू की सुमनला? काय झाले हे मला तेव्हा कळलं नाही पण काही तरी वाईट झालं अस जाणवलं.
सुमन मोरीत गेली आंघोळ करून आली त्या दिवसापासून तिच शाळेत जाणे बंद झाले.
बाबा घरी आले त्यांनाही समजले ते. सुमनलाच खूप बोलले.
थोडे दिवस सुमनला मावशीकडे पाठवले गेले. नंतर तिच्या करता स्थळ पाहून लग्न लावून दिले. पण झालेला प्रकार सुमनला विसरता आला नाही.

तिची घुसमट होत होती. नवऱ्याला ही तिला सांगता येत नसावे.
त्यामुळे ती त्यांच्या जवळ जायला घाबरायची. तिच्यात कमी आहे असा सर्वांचा समज झाला व तिला माहेरी पाठवून दिली.
तिला डिव्होर्स दिला व मुलानी दुसर लग्न ही केलं.”
“पण घरच्यांनी सुमन ची ट्रिटमेंट कां नाही केली?.
“झालेल्या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. घरात त्या गोष्टीची कोणी वाच्यता करत नसे, बाबा आजी यांच्यामते लग्न झालं की सगळं ठीक होईल.

पण तसे झाले नाही. सुमन दिवसेंदिवस मिटतच गेली. एक दिवस ती घरातून निघून गेली.
खूप शोधा शोध झाली. एका विहिरीत तिने जीव दिला.
मी खूप लहान होतो त्यावेळी, आप्पा म्हणाले. पण मोठा झालो तेव्हा वाटलं तिला बोलतं करायला हवं होतं.
जी चूक तिने केली नाही त्याची शिक्षा तिला मिळाली आणि गुन्हेगार मोकाट सुटले.
बाहेरचे गुन्हेगार माहित नव्हते पण घरातले हीअपराधी आहेत.
बोलता बोलता अप्पांचा गळा भरून आला. म्हणूनच मनूला पाहिलं की सुमन येते रे डोळ्यासमोर, आणि आप्पांच्याने पुढे बोलवेना. 

अशोक ने सांगितलेली घटना ऐकून नंदा विचारात पडली.
जुन्या अनुभवाने आप्पा मनुला सतत धाकात ठेवू पाहतात, पण आता काळ बदलला आहे.
मुली तितक्या भोळ्या राहिल्या नाही.
सिनेमा, टीव्ही, सोशल मीडियामुळे त्यांना बरेच काही कळते, प्रशिक्षण दिले जाते. तरीही काही घटना घडतातच.
सकाळी पेपर आला तेव्हा आप्पा बाहेरच्या खोलीतच होते मनू ने पेपर घेतला व त्यात आलेले परिशिष्ट सिनेमा पाहू लागली.

“आई बघ किती छान ड्रेसेस आलेत समर सीजन करता.”
“हे -हे- असे कपडे घालता तुम्ही मुली मग होणारच असल्या घटना” आप्पा पेपर पाहत बोलले.
” आप्पा तुमची काळजी समजते मनू म्हणाली, पण किती दिवस मुलींनी घाबरून घरात बसायचे? आता काळ बदलला. मुली शिकून नोकरी करतात त्यांना रात्री अपरात्री कामावरून यावे लागते.”
“त्याचीच तर चिंता वाटते ग !”

“अप्पा आजकाल कोणत्याही वाहनात बसताना त्या गाडीचा नंबर चालकाचा फोटो आम्ही जवळच्याना सेंड करतो.
तसेच पोलीस इमर्जन्सी नंबर ही फोन मध्ये सेव्ह केलेले असतात आणि पर्स मध्ये काही गोष्टी आम्ही ठेवतो. जसा छोटा चाकू,मिरची पावडर ,किंवा पेपर स्प्रे वगैरे.
यातूनही काही घडलेच तर कराटे येतात मला.”  मृण्मयी ने आप्पांची समजूत काढली.
“आणि तरीही काही वाईट घडलं तर मी सरळ पोलीस स्टेशन गाठीन. घाबरून  घरात बसणार नाही.” असं ठामपणे अप्पांना  सांगितले.

रात्री आप्पांना औषध द्यायला अशोक त्यांच्या खोलीत आला.
” आप्पा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंतर मुलींबरोबरच मुलांनाही सातच्या आत घरी या असा नियम का नाही? तुम्ही शुभम ला का नाही बरं टोकत?”
“अरे मुलांना काय गरज ?”
“कां मुलं बाहेर टवाळक्या करत फिरलीच नाही तर मुलींना कसलीच भीती राहणार नाही. आपण पाहतो ना बरीच मुलं काम नसताना उगाचच रात्री बाहेर असतात त्यांनाही थोडे बंधन घालायला हवे.

आपल्या मागच्या मल्टी मधे साठे रहातात त्यांचा विजय आपल्या शुभम येवढाच आहे तो असाच रात्री उशिरा पर्यंत बाहेर फिरत असतो , एकदा कुठल्या ए.टी.एम मधे दरोडा पडला तेव्हा विजय तिकडेच फिरत होता संशयित म्हणून त्याला ही पोलिसांनी ताब्यात घेतले.
आपल्या मुलांपेक्षाही  जी मुले शिक्षणा साठी किंवा नौकरी साठी घरापासून दूर म्हणजे दुसर्‍या शहरात रहातात त्यातले काही तर अगदीच बेछूट वागतात. त्यांना रागवणारे, कंट्रोल करणारे कोणीही नसते.
त्यामुळे ते हव तसं वागतात, काही ड्रग्स दारुच्या आहारी जाऊन भान विसरतात.

म्हणून मला वाटते मुलीं प्रमाणे मुलांना ही लहानपणापासून वळण लावायची गरज आहे.”
“हो तू म्हणतो त्यात तथ्य आहे. शेवटी समानतेचा जमाना आहे. जे नियम मुलींना तेच मुलांनाही लागू व्हायला हवे.
समानता म्हणून नाही तर जबाबदारी म्हणूनही.”
दुसऱ्या दिवशी शुभम बाहेर निघाला तेव्हा आप्पा बाहेरून फिरून येत होते.
“शुभम आठ वाजेपर्यंत घरी ये.”

 “कां अप्पा काही काम आहे कां ?”
“नाही.”
“मग?”
“अरे काम नसताना उगाचच बाहेर वेळ घालवण्यापेक्षा जरा घरी येऊन आईची मदत कर. तिला एकटीला खूप काम पडतं.
“पण अप्पा मनू आहे न मदतीला?”
“तिच्या एकटिच्या वरच सगळी बंधनं, नियम नाहीत. त्यामुळे ते तुला ही लागू होणार.”
आत मध्ये अशोक आणि नंदा हा संवाद ऐकत होते.
अप्पानी घेतले ला स्टॅन्ड पाहून  ते दोघे एकमेकांकडे पाहून हळूच हसले.
समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
सामाजिक मानसिकतेला उत्तर
पश्चाताप
सुख

Leave a Comment

error: Content is protected !!