चांगुलपणाचं ओझं

© सौ. प्रतिभा परांजपे
सुषमाताईना झोप येत नव्हती. रात्रभर त्या या कुशीवरून त्या कुशीवर होत होत्या .डोळ्याला डोळा लागत नव्हता. नीताला, त्यांच्या सुनेला माहेरी जाऊन पंधरा दिवस व्हायला आले पण–पण इतक्या दिवसात तिने स्वतःहून एकदाही फोन केला नव्हता.
सुषमा ताईंना नीता आणि नात छकुली  शिवाय घर सुन सुन वाटत होत. त्यांनी सौरभला आपल्या मुलाला विचारलं “अरे नीता चा काही फोन आला कां, केव्हा येते..?
सौरभ कामावर निघायच्या गडबडीत होता. 

“आई माहित नाही ,राहू दे तिला निवांत,  बरेच दिवस म्हणत होती आई ची आठवण येते आहे ,कंटाळा आला होता ऐकून ऐकून जरा डोकं शांत होईल.आणी ठिकाणावर.”
“अरे पण निदान फोन तरी’?”
“मी संध्याकाळी विचारतो”, म्हणत सौरभ कामावर निघून गेला.
सुषमा ताईंना बरेच दिवसापासून निता चे काहीतरी बिनसले आहे अशी शंका येत होती, जेव्हा तिने माहेरी जायचे रिझर्वेशन केले तेव्हा त्यांनी विचार केला आईची आठवण येत असावी ,पण– तरीही आपल्या जवळ काहीही न बोलता अचानक जायच ठरवले हे त्यांना जाणवले.

पण तरीही काही तरी चुकतंय असं मनात येत होते. रात्री सौरभ च्या खोलीतुन नीताचा व सौरभचा व्हिडिओ कॉल वरील संवाद त्यांच्या कानावर येत होता.
“कांग कधी येणार ? मी येऊ कां घ्यायला?”
नीता रागारागात म्हणत होती, ” तुझे काय अडले रे मी नसले तर?? आई आहेच ना सर्व करायला?”
“असं का म्हणते?  तुझी आठवण येते.”सौरभ तिला समजवायचा प्रयत्न करत होता.
“मग काय म्हणूं?? माझं असं काय आहे त्या घरात? त्या म्हणतील ते करायचे, मला मनाने असे कुठे काय कराल देतात?? छकुलीला ही फार लाडावून ठेवले आहे, सगळ त्याच करणार”.नीता रागारागाने बोलत होती.

पुढच बोलण सुषमा ताईंच्याने ऐकवेना, त्या खोलीत घेऊन पलंगावर पडल्या.
काय  ऐकलं हे मी? मी नेहमीच तिच्या सुखासाठी झटत होते. नीता नवीन आहे तिला कामाची सवय नाही असा विचार करून सगळं करायची. रात्र विचार करण्यात सरली.
सकाळी  रोजची कामे आटोपून त्यांनी नीताला फोन केला,  रिंग बरेच वेळा गेली, फोन कोणी उचलला नाही. आत्ता कामात असेल असे समजून त्यांनी मग थोड्या वेळाने परत फोन लावला .

“हैलो नीता”
“अहो मी आशा बोलते ,नीता ची आई”.
 “अग बाई नमस्कार. कशा आहात??
“मी ठीक आहे . तुम्ही कशा आहात? नीता  आंघोळीला गेली आहे आणि छकुली खेळती आहे.”
“काय म्हणते नीता? बरेच दिवस झाले फोन नाही म्हणून विचार केला आपणच बोलावं, करमत नाही हो. हया दोघिंशिवाय. घर अगदी सुनं सुनं वाटत.”
“हं बरोबरच आहे.”  आशा ताईं म्हणाल्या.

” काय झाले आहे नीताला? काही बोलली का तुमच्याजवळ? जरा अपसेट असते आजकाल” सुषमा ताईंनी विषयाला हात घातला.
“अहो चालायचंच आज कालच्या मुलींना न सगळ्याच गोष्टींची घाई.”
“म्हणजे –माझं काही चुकलं का हो? काही बोलली का ती’?”
“तुम्ही खूप चांगल्या मनाच्या आहात सुषमाताई ,पण काय आहे ना ,मी जरा स्पष्टच बोलते, नीताला आमच्या संसाराची, घर कामाची भारी हौस. तिला वाटतं हा तिचा संसार तिने स्वतः मनाने सर्व करावं.
पण काय तुम्ही तिला  काही च सांगत नाही आणि मनाने करायचा धीर होत नाही .त्यामुळे तिला ते घर आपलेसे वाटत नाही करु द्या तिला,अहो चुकत चुकत शिकेल आणि मी समजवेन तिला, तुम्ही नका फार काळजी करू,” असे म्हणत आशाताईंनी फोन ठेवला.

आता सुषमा ताईंना घटनांची सुसंगती लागायला लागली. आपलं काहीतरी चुकतंय या जाणिवेने  त्या मनातून आणखीनच खट्टू झाल्या.
संध्याकाळी देवदर्शन व भाजी घेऊन यावे म्हणजे मन शांत होईल या विचाराने त्या बाहेर पडल्या, समोरून त्यांची दुरची भावजय कम मैत्रीण शोभा येताना दिसली.
अगं “मी तुलाच फोन करणार होते, आम्ही महाबळेश्वर-पाचगणी ला जात आहोत आठ दिवस. छान एंजॉय करू. तुला जमेल की नाही? तू काय बाई सून,नाती मधेच गुंग असते. पण तरीही म्हटलं एकदा विचारून घ्यावे. सध्या तुझी सून माहेरी गेली आहे न?”

सुषमाने विचार केला जावे फिरायला , मन तेवढच शांत राहिल.
“हो ,येते मी पण.”
“ठरलं तर मग परवाला निघतोय आपण.”
घरी सौरभ  व त्याच्या बाबांनी म्हणजे पती देवांनी आनंदाने संमती दिली जणू त्यांनाही “अकेले है तो क्या गम है “असे हवे असावे.
सुषमाताईंनी टूरवर जायची तयारी केली.
आठ दिवस खूपच धमाल-मस्ती मध्ये गेले सुषमाताईंचे. दिवसभर खूप फिरणे, गप्पा, खाणे. रात्री हॉटेलमध्ये स्टे, रात्री दोघी दोघी एका खोलीत अशी झोपायची सोय .

“सुषमा एक विचारू? “आल्यापासून पाहतेय एकफोन नाही आला  नीता चा” शोभा ने विचारले??
“इकडे यायचं कळवले आहे तिला.”
“मग काही बिनसलं आहे का तुमच्या त” ?
“बिनसलं असं नाही ग”
“मग?”
सुषमा ने मग झाले ते सांगितले.

“माझं नेमकं काय चुकतंय हेच मला समजत नाही ग, मी तिला अगदी मुलीसारखं वागवते.”
“तेच तर चुकतंय तुझं , म्हणजे अगं तू जशी नाही तसं दिसायचा प्रयत्न करणं सोड. म्हणजे असं की तू आदर्श सासू व्हायचा विचार सोड. जशी आहेस तशी वाग”.
‘ अग पण ‘.
“वाईट  वागअसे म्हणत नाही मी” पण ,– तुझ्याअती चांगलेपणाच ओझं होतंय, तुलाही आणि तिलाही. त्याने सगळी गडबड होतीआहे.
नीताला करुदे जबाबदारीने , स्वतः च्या मर्जी ने

‘सांगते ग मी तिला.’
“असं करू नको तिला तिचं कळून सवरुन करू दे. तू थोडं थोडं कामातुन निवृत्त हो. जसा पतंग आकाशात मोकळेपणाने विहरतो जरी त्याची दोरी  हातात असली तरी, पण जर दोर सारखी ओढली तर पतंग उंच कसा जाईल? धाग्याला थोडी ढील द्यायला हवी ना ?”
सुषमाला शोभा चे बोलणे लक्षात येत होते.
“खरंच ग माझ्या लक्षातच नाही आले मी आपले तिला त्रास नको म्हणून—“

 “हो पण आता थोडं दुर्लक्ष कर . इतर ठिकाणी आपण ऐकतो, पाहतो सुनांना काम करायला नको असतं पण तुझ्या नीताला कामाची हौस आहे. तर प्रोत्साहन दे. तिला काम करू दे म्हणजे तिला घर आपलंस वाटेल.”
शोभा च समजावणं  सुषमा च्या लक्षात येते होते .
“आणि झोप आता शांत.”
 “उद्या आपल्याला निघायचे ना?? सुषमा ने विचारले.

 “नाही ,माझ्या मैत्रिणीचा वाई मध्ये एक वाडा आहे आपण दोघी तिथे दोन दिवस राहणार आहोत. तेव्हा घरी जाण्याची घाई करू नको.”
दुसरे दिवशी सुषमा ला नीता चा  फोन” आई मी परत आले आहे, तुम्ही केव्हा पोहोचता? घराची काळजी नका करू.”
“अगं आम्हाला अजून दोन-तीन दिवस लागतील. आम्ही मजेत आहोत. तू आहे त्यामुळे मला घराची ही चिंता नाही. छकुलीसाठी गंमत घेऊन येईन” म्हणत सुषमाने फोन बंद केला.
*********
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!