माहेरचा आब

© सौ. प्रतिभा परांजपे
“अगं आल्यासारखी चार दिवस तरी राहणार आहे ना? दोन वर्ष झाली तुला न पाहून. इतक्या वर्षांनी येत आहात”. सरोज ताई फोनवर त्यांच्या मुलीशी सीमा शी बोलत होत्या.
सीमा लग्नानंतर नवऱ्याबरोबर न्यू जर्सीला सेटल झाली होती.  लॉक डाऊन मुळे दोन वर्ष येता आले नव्हते त्यामुळे लेकीला आणि नातीला कधी पाहते असे  सरोज ताईंना झाले होते.
“काय बाई सगळीच घाई “म्हणून त्यांनी फोन ठेवला व आत येऊन सून मनीषाला म्हणाल्या, “अगं बुधवारी येतात आहे सीमा आणि जावईबापू आधी त्यांच्या घरी उतरतील व मग इकडे येतील. आता चार दिवसात काय काय करायचं याची मी लिस्ट बनवते त्याप्रमाणे सामान मागवून ठेवू”

दोन वर्षांनी मुलगी माहेरी येणार या उत्साहात सरोज ताईंना काय करू नी किती करू असे झाले होते.
बाळंतपणाला त्यांना जाता आले नव्हते, मुलीला काहीच खाऊ घालता आले नाही म्हणून मेवे घालून लाडू करायचे ठरवले. नातीला जे घ्यायचे ते मुलीला विचारूनच आणावे. असे अनेक मनसुबे त्या उत्साहाने मनीषाला सांगत होत्या.
मनीषा मनातल्या मनात होणाऱ्या खर्चाचा अंदाज लावत होती.
दोन वर्षाच्या लॉक डाऊन ने सुधीरची नोकरी जरी गेली नव्हती तरी पगार कमी केला होता पण नाही पेक्षा काहीतरी हातात येते आहे म्हणून चालले होते .

मनीषाचा साड्यांचा बिजनेस पण या दोन वर्षात बंद पडला होता आता लॉकडाऊन संपले तेव्हा सुरुवात होत होती.
एक नवीन चांगला मोबाईल घ्यायला हवा आहे साड्यांचे फोटो पाठवायला, ऑर्डर घ्यायला , जुना फोन आताशा हॅंग होऊ लागला होता ,जमलेल्या पैशातून नवा घ्यायचा विचार करत होती पण– आता ते शक्य दिसत नव्हते.
संध्याकाळी सुधीर आल्यावर ताईंनी लिस्ट सुधीरच्या हातात दिली .

दोन वर्षांनी धाकटी बहीण येणार तिच्या माहेरपणात कुठे कमी नको पडायला म्हणून सुधीरने आपले पासबुक काढले, खात्यामध्ये तीन चार हजार उरले होते त्याला काळजीत पाहून मनीषाने आपल्या पर्स मधून दोन हजार  काढुन त्याच्या हातावर ठेवत  ती म्हणाली ‘आलेला आनंदाचा क्षण आनंदाने साजरा करू’.
” अग पण हे पैसे तुझ्या मोबाईल—
“अहो बहिण काय फक्त तुमचीच आहे माझी कोणीच नाही कां?  नका विचार करू”
सुधीर सर्व सामान घेऊन आला.

सरोज ताईंनी चांगल्या तुपाचे भरपूर मेवे घालून लाडू तयार केले.
“अरे सुधीर पहा बरं बाहेर टॅक्सीचा आवाज आला का मी औक्षणाची तयारी करून ठेवते. इतक्या दिवसांनी माझी लेक आणि नात येणार ,कधी पाहते असे झाले आहे.”
सीमा आली त्या क्षणापासून सरोज ताईंना उसंत नव्हती नातीला कुठे ठेवून कुठे असे झाले. सीमा ही आई  व मनीषा च्या गळ्यात पडली.
संध्याकाळी  जावयांना काय खावेसे वाटते ते विचारून सरोज ताई  स्वयंपाक घरात आल्या .
मनीषा फोनवर बोलत होती.
“कोणाचा फोन गं?”
“आईचा, आत्याला बरं नाहीये सारखी माझी आठवण काढते”

“अगं पण मागच्याच महिन्यात तू गेली होतीस ना त्यांना पाह्यला? अगं या वयात तब्येत नरम गरम  राहणारच. तुझी आई ना फारच घाबरते बाई. असे सारखे सारखे बोलावणे बरे नाही.” रागात बोलत सरोज ताई बाहेर निघून गेल्या.
मनीषा कणीक भिजवता भिजवता विचार करत होती आत्याचे वय फार नाही पण हा आजारच असा की जरा मध्ये तब्येत जास्त तर जरा मध्ये ठीक. आणि मनीषा तर आत्याचा जीव की प्राण .
आत्याला मुलीची खूपच हौस पण एक मुलगा झाला मी संसार संपला. मग मनीषाचे बाबा तिला परत घेऊन आले तेव्हापासून आत्या माहेरीच.

 मनीषा झाली तेव्हा आईची तब्येत फारच खालवली तेव्हा आत्यानेच मनीषाला सांभाळले कितीतरी वर्ष मनीषा ला हीच आपली आई असे वाटे.
पुढे आई बरी झाली पण आत्याचे आणि तिचे प्रेम तसेच राहिले. मनीषा च्या लग्नाचा सगळा खर्च आत्याने केला आणि आज आत्याला बरे नाही ती सारखी तुझेच नाव घेत असते तुला पाहण्यासाठी तिचे प्राण अडकले आहेअसा आई चा फोन.
रात्री मनीषाने आईला फोन लावला दोन-चार दिवसा करताच सीमाताई आल्या आहेत  नेमके तेव्हाच येणे बरेच नाही दिसणार.

सकाळी परत आईचा फोन आला फोन सुधीरने घेतला .
“कोणाचा रे”? सरोज ताईंनी विचारले.
“अग हिच्या आईचा होता.”
” काय बाई –कालच तर बोलणं झालं ना?
“अग हो पण आत्या आले काय वाटेल त्यांनाचार दिव—“
“नाही रे पाठवता येणार म्हणा ,इतक्या वर्षांनी इतक्या दुरून तुझी बहीण आणि?”

“हो पाहतो” म्हणत सुधीर बाहेर गेला.
मनीषाने बॅग भरायला घेतली ते पाहून सरोज ताईचा पारा चढला त्या खूप बडबडल्या पण सुधीरने लक्ष नाही दिले मनीषाला गाडीत बसवून आला.
दुपारी चहा पीताना सीमा म्हणाली आई “आमचा दिल्ली आग्रा फिरायला जायचा प्लॅन आहे ,आणि तिकडे सासरी यांचे काका काकू आले आहेत त्यांना ही पियू ला पहायचं आहे तेव्हा आम्ही संध्याकाळीच तिकडे घरी जाऊ, मग तिथूनच पुढे.”
“अग बाई केव्हा ठरलं?  तू काही बोलली नाही”  कसे आहेत ही तुझ्या सासरची माणस चार दिवस ही राहू देणार नाही धडपणे.”

“आई पुढच्या वेळी नक्की थांबेन.”
“अगं पणतुझ्या करता साडी घ्यायची होती.”
“आई साड्या कोणी नेसत तिकडे? मुळीच देऊ नको. आणि इथले कपडे तिकडच्या हवेला मुळीच चालायचे नाही तेव्हा पियूलाही काही कपडे, खेळणी घेऊ नको उगाच वजन होतं. आणि तिकडे सर्व चांगल्या क्वालिटीचे मिळतं. मागे मी ड्रायफ्रूट आणले होते तू पाहिलेत ना म्हणून काहीही देऊ नको उगाच वजन वाढत सामानाचं विमानाने जाताना.”

“अग पण हे लाडू” ?
“खाल्ला ग मी व ह्यांनी एक एक तेवढा पुरे, फक्त चार लाडू दे खाऊ म्हणून,माझं शरीर पाहते ना केवढे वजन वाढले आहे ”   ते केलेले वहिनीला दे तिची तब्येत तरी जरा सुधारेल.  सीमाच्या बोलण्याने सरोज ताईंच्या  उत्साहावर पाणी पडले,
कितीतरी बोलायचे होते सांगायचे होते. मुलीचे,नातीचे लाड करायचे होते, पण– या येणाऱ्या एन.आर.आय लोकांचे हे असलेच. म्हणायला पंधरा दिवस म्हणतात येणार पण घरच्यांच्या वाटेला दोन दिवस मिळाले तरी खूप. 
खिन्न मनाने सरोज ताईंनी मुलीची ओटी भरली व भरल्या डोळ्यांनी तिला टाटा केले

.रिक्शामध्ये बसल्या वर सीमाच्या डोळ्यातलं पाणी पाहून तिच्या नवऱ्याने सौरभ ने विचारले” सीमा मला एक कळलं नाही आपण दोन दिवसांनी निघणार होतो मग तू काका काकुंचे ‌ कारण कां सांगितले?
किती वाईट वाटलं आईंना, आणि त्यांनी किती  कौतुका ने लाडू केले होते त्यालाही तू नाही म्हटले.
पियू साठी त्यांच्या मनात काहीतरी घ्यायचे होते पण तू त्यांच्या सगळ्या गोष्टींना नाक मुरडत होती त्यांच्या मनाचा जराही विचार केला नाही किती वाईट वाटत होतं त्यांना.”

 “हो रे तुझं म्हणणं खरं आहे पण तुला जे वाटतंय तसं कारण नाहीये मी दोन दिवसात अनुभवलं की या दोन वर्षात दादाची आर्थिक परिस्थिती डळमळली आहे त्यातून तो वहिनी स्वतःला सावरत आहेत अशावेळी मी त्यांना खर्चात टाकणे योग्य वाटत कां?
आणि मी जर हे आई किंवा दादा जवळ बोलले असते तर त्यांना लाजिरवाणं झालं असतं म्हणून मला काहीच आवडलं नाही किंवा नको आहे असे दाखवले ,त्यामुळे आईचा नाईलाज झाला. 
आणि मी दादा कडून  मला आवडणारे  त्याचे पारकर पेन मागितले जे बाबांनी आम्हा दोघांना मिळून एकच दिल होत. व आईंनी शिवलेली साड्यांची गोधडी.

या मुळे त्यांची बाजूही सावरली गेली. आणि लवकर निघण्यामागचे कारण जोपर्यंत आपण तिथे होतो आईने वहिनीला जाऊ दिले नसते. वहिनीची आत्या खूप आजारी तिला वहिनी ला भेटायची खूप इच्छा होती म्हणून हा सगळा फार्स केला रे, आपल्या माणसांचं मन आपणच जपलं पाहिजे ना?”
सीमांचं बोलणं ऐकून सौरभ म्हणाला, “किती प्रेम आहे ग तुम्हा भावा बहिणीचे! मानलं मी तुला. आय ऍम प्राऊड ऑफ यू.”
इकडे सगळी दुपार व संध्याकाळ सरोजताईंच मन उदास होते.

रात्री सुधीर आला तेव्हा त्याने मनीषा च्या आत्या गेल्याचे सांगितले. शेवटची भेट होऊ शकली आत्यांशी हे समजल्यावर सरोज ताईंच्या जिवात जीव आला. 
डोळ्यासमोर मनीषाचा उदास चेहरा दिसत होता. आपल्या अडमुठेपणामुळे तिला लवकर जाता आले नाही .
आपल्या लेकी करता या मुलीचे मन दुखावले त्या आपल्या मुलीला वेळ कुठे होता आईसाठी ?
पण आता पश्चाताप करून काहीच फायदा नाही त्यापेक्षा मनीषालाच मुलीप्रमाणे वागवले तर तिचे दुःखही कमी होईल  व कुठे तरी झालेल्या चुकिचे प्रायश्चित्त सुद्धा, असा  सरोज ताईंनी मनाशी निश्चय केला .

दोन दिवसांनी मनीषा परत आली तेव्हा सरोज ताईंनी तिला प्रेमाने जवळ घेत तिचे सांत्वन केले. सरोजताईंच्या प्रेमळ शब्दांनी मनीषाच्या दु:खावर अलगद फुंकर घातली आणि ती थोडी शांत झाली.
सीमाने मनातलं मनातच ठेवत समंजसपणाच्या वागणूकीने तिच्या माहेराचा आणि आई, वहीनीमधल्या नात्याचाही आब राखला.
*********
समाप्त
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!