प्रायश्चित्त

  1. तिची गगन भरारी
  2. डाग
  3. सुख
  4. सत्य
  5. नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी)
  6. तडा
  7. ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!”
  8. प्रायश्चित्त
  9. उत्तर 
  10. गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!!
  11. निलिमा
  12. आपली माणसं
  13. विश्वास
  14. जाणीव
  15. गुलमोहोर
  16. हिऱ्याची अंगठी
  17. सासूबाईंचे माहेर
  18. सवाष्ण

©️ सौ.प्रतिभा परांजपे
आज फ्रेंडशिप डे होता. सकाळपासून व्हाट्सअप वर, फेसबुक वर फ्रेंडशिप डे चे मेसेज येत होते. पण ज्या माझ्या सखीचा दरवर्षी न चुकता सकाळी सकाळी फोन यायचा त्याची मी वाट पाहत होते.
 शेवटी मीच लावला फोन सुनंदाला.
“अग काय हे– सकाळपासून मी वाट पाहते तुझ्याच फोनची.”
” मगs तू करायचा.”

 “केला ना, काय करणार? तू फारच बिझी असते. माझं काय मी रिकामटेकडी, मुलं आपल्या कॉलेजच्या अभ्यासात, हे आपल्या कामात. मी घरीच असते.”
“अगं किती चिडतेस? ऐक तर आधी. मी आले होते दोन दिवसा करता आईकडे.”
“केव्हा? मला न भेटता गेली?’
” अगं वेळच कमी होता, आईला बरं नाहीये ग.”
“काय होतंय? बीपी वाढलय कां?”

 “ते तर आहेच ,त्याशिवाय ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालाय.”
“काय सांगतेस?” मी दुःखी स्वरात विचारले.
” मागे आले ना तेव्हाच टेस्ट झाल्या होत्या, त्याचे रिपोर्ट मिळाले, म्हणून आले. किमोथेरपी केली गेली एकदा, पाहू काही फायदा होतो का.”
सुमन काकूंचा सुंदर चेहरा माझ्या मनःपटलावर उमटला.
सुनंदा आणि मी विशाखा, आम्ही प्राथमिक शाळेपासूनच्या मैत्रिणी. सुनंदाचे घर शाळेच्या जवळच. मधल्या सुट्टीत आम्ही बरेचदा तिच्या घरी जात असू. सुमन काकू आम्हाला कधी शंकरपाळे, चिवडा कधी चकली असे खाऊ म्हणून देत असत.

दहावीनंतर सुनंदाचे आणि माझे विषय वेगळे झाले , शाळा कॉलेजही वेगळे झाले तरी आमची मैत्री तशीच घट्ट होती. वेळ मिळाला की आम्ही भेटत असू.
शिक्षण झाल्यानंतर आमचे दोघींचे लग्न झाले, माझे सासर इथेच गावात पण सुनंदा रायपूरला गेली.
आता जेव्हा ती माहेरी येत असे तेव्हा भेटत असू.
लवकरच सुनंदाच्या लहान भावाचे समीरचेही लग्न ठरले . लग्नात आम्ही खूप मजा केली .सुनंदाची भावजय शिल्पा शांत व अबोल वाटली.

 सुमन काकू तर खूप खुश होत्या .
लग्नानंतर मंगळागौर संक्रांतीचा सण खूप थाटात पार पडला पण यावेळेस सुनंदा जरा उदास वाटली, मी विचारले तर म्हणाली आई आणि वहिनीचा खूप पटत नाही ग.
काळ आपल्या गतीने चालला होता सुनंदाने बुटीक सुरू केले त्यामुळे तिला आता सारखे सारखे येणे जमत नव्हते.
बरीच वर्ष वाट पाहून ,उपास तपास ,नवस केल्यानंतर शिल्पाला दिवस गेले. 
काकूंनी खूप थाटात डोहाळ जेवण केले सुनंदाही आली होती पण सातव्या महिन्यात शिल्पा बाळंतीण झाली. मुलगी झाली पण खूपच अशक्त होती.

 त्यानंतर माझ्या मुलीचे पुण्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचे म्हणून मी तिच्याबरोबर पुण्याला गेले. तिथे तिची राहायची व्यवस्था वगैरे करून परत आले .
पहातां पहाता एक वर्ष झालं
आताशा सुनंदा फार कमी येत असे.
एकदा तिने फोनवर सांगितले की समीरची मुलगी चिंगी पायाने अशक्त आहे. वर्षभराची झाली तरी उभी नाही राहू शकत तिची ट्रीटमेंट चालू आहे. डोळ्यांनी पण तिला खूपच कमी दिसते.

एक दिवस बाजारात समीर आणि शिल्पा भेटले. मी चिंगी व काकूंच्या तब्येतीविषयी विचारलं तेव्हा समीर म्हणाला तो आणि शिल्पा आता वेगळं घर करून राहतात.
घरी आल्यावर मी विचार करत होते एकच मुलगा पण तरीही वेगळे घर का बरे?
आता मला सुमन काकूंची काळजी वाटू लागली म्हणून एक दिवस मी त्यांना भेटायला घरी गेले.
काकूंना पाहून खूप वाईट वाटलं काकू बिछान्यातच होत्या. पलंगाजवळ औषध ठेवलेली होती.
मला पाहताच त्यांच्या डोळ्यांना धार लागली.

 “पहा ना ग विशाखा माझ्याकडून आता काहीच काम होत नाही तुला साधा चहा पण—“
“काकू बरे वाटेल हो तुम्हाला लवकरच, आजकाल खूप छान औषध आहेत” मी त्यांचे सांत्वन केले.
थोड्यावेळाने काका ही आले. मी घरी परत यायला  निघाले तेव्हा काका बाहेर सोडायला आले, म्हणाले शरीराच्या इलाजासाठी औषध आहे पण स्वभावाला काही इलाज नाही.
असेच दिवस जात होते आणि एक दिवस सुनंदाचा फोन आला “आईची तब्येत जास्त आहे दवाखान्यात ऍडमिट केले आहे काय होईल सांगता येत नाही. मी,बाबा आणि समीर पाळीपाळीने दवाखान्यात जातो पण बाबांना फार दगदग होते” .

” मी येऊ का दवाखान्यात बसायला? वेळ ठरवून सांग पाच सहा तास मी येऊ शकते” मी तिला विचारले.
मी दवाखान्यात जायला लागल्याने सुनंदाला थोडा आराम झाला. घरचे काम आटोपून ती येत असे.
काकू खूपच अशक्त झाल्या होत्या थोडेसे बोलल्या तरी थकवा यायचा.
एक दिवस सुमन काकू माझा हात धरून म्हणाल्या “विशाखा मला काही सांगायचे बोलायचे आहे ग पण सुनंदा बोलू देत नाही पण बोलल्याने मनावरचा ताण हलका होईल . एक गोष्ट माझ्या मना ला डाचते आहे बोलले नाही तर माझ्या जीवाला चैन पडणार नाही जीव अडकून राहील”

“बोला काकू, बोलून मन शांत होणार असेल तर.”
” विशाखा तुला ठाऊकच आहे शिल्पा आणि समीर वेगळे राहतात. सर्वांना वाटते माझे शिल्पाचे पटत नाही. पण खरे कारण वेगळेच आहे. तुला माहित आहे चिंगी जन्मतः अशक्त आहे सातव्या महिन्यात झाली त्यामुळे असे असेल असे आम्हाला वाटले. पण सहा सात महिन्याची झाली तेव्हा कळले की ती पायाने अधू आहे, मी तिचे सर्व औषधपाणी, तेल मालिश सर्व  अगदी मनापासून केलं पण काहीच फायदा होत  नव्हता.

एक दिवस समीर फोनवर कोणाला सांगत होता ते माझ्या कानांवर आले ,डॉक्टर म्हणतात ही जन्मजात बिमारी आहे ती तशीच राहणार. हे सगळं ऐकलं मी,माझं तर अवसान गळल. एक तर इतक्या वर्षांनी मूल झालं आणि तेही अपंग ?
आता माझा सगळा उत्साह च संपला, व चिडचिड व्हायला लागली. मी चिंगीकडे दुर्लक्ष करू लागले, माझ्या समीरच्या नशिबात हे काय आलं असे मला वाटू लागले.
शिल्पाचे नी माझे संबंध तसेच खूप चांगले नव्हते. आता तीही नोकरी करू लागली त्यामुळे चिंगीची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.

 शिल्पा जाताना चिंगीला डायपर लावून जायची तरीही मला चिंगीकडे लक्ष ठेवावे लागे.” इतकं बोलता बोलता काकूंना थकवा आला काही क्षण त्यांनी डोळे मिटून घेतले.
मी विचार करत होते परस्पर संबंधांना कटूता यायला काहीही कारण असू शकतात.
थोड्या वेळाने काकूंनी पाणी मागितले, मी त्यांची उशी वर करून मानेला हात देत बसते केले.
डोक्यावरचे सगळे केस किमोथेरेपी ने झडून गेले होते.
माझ्या डोळ्यासमोर त्यांची लांब सडक वेणी आणि त्यावर माळलेला गजरा दिसू लागला किती सुंदर दिसायच्या काकू आणि त्यांना  किती हौस होती.

अजार पण माणसाचे काय काय हिरावून घेते, पण असं वाटतं बरच काही शिकवून ही जाते म्हणूनच काकूंना चिंगीच्या त्रासाची जाणीव झाली असावी.
काकू पुढे म्हणाल्या “हळूहळू मी चिंगीचा रागराग करू लागले. ती तर अजाण बालिका होती. तिला मी बोललेले जरी कळत नव्हते तरी माझा राग तिला जाणवायचा मग ती रडायला लागायची.
एक दिवस मी अशीच चिडचिड करत होते. एक तर मुलगी,  अशी अपंग, त्यापेक्षा नसतीच झाली तर, मी बडबडत होते. चिंगी रडत होती ,दारात उभी असलेल्या शिल्पाने माझे बोलणे ऐकले तिने धावत येऊन चिंगीला उचलले व खोलीत निघून गेली.

 दोन दिवसांनीच शिल्पा चिंगीला घेऊन माहेरी निघून गेली. बरेच दिवस झाले तरी परत येण्याची चिन्ह दिसत नव्हती. मी समीरला विचारले तो म्हणाला येईल लवकरच. शिल्पा आली व तिचे सामान पॅक करायला लागली. मी विचारले तर म्हणाली, आई आता तुम्हाला चिंगीचा त्रास नाही सहन करावा लागणार आम्ही दुसरं घर घेतलं आहे तिथे जातोय.
मला आपल्याकडून झालेली चूक लक्षात आली. जाताना शिल्पा म्हणाली मी इथून का जाते याचे खरे कारण मी कोणालाही सांगणार नाही. तुमच्या मुलांसमोर तुमचा मान मी कमी होऊ देणार नाही.
शिल्पा समीर आणि चिंगी निघून गेले 

आता रिकामे घर खायला उठायला लागले हे पण उदास असायचे. मला माझे मन खात राहायचे. चिंगीचा भोळा चेहरा डोळ्यासमोर यायचा.
त्यानंतर मला पाहायला सुनंदा आली एक दिवस शिल्पा व चिंगीला भेटायला त्या घरी गेली ,परत आली तेव्हा म्हणाली आई चिंगीची दृष्टी पण दिवसेंदिवस कमी होत आहे सगळं चिंताजनक आहे चिंगीला सांभाळायला वहिनीची आई आली आहे.
आता मला आपल्या अपराधाची जाणीव व्हायला लागली.
हे काय केलं मी म्हणूनच बहुतेक देवाने मला हे अजार पण दिले, आणि आता जेव्हा माझं शरीर काम करेनासं झालं मला चिंगीच्या असहाय्यतेची जाणीव व्हायला लागली. माझा अपराध बोध माझ्या अंतर्मनाला खाऊ लागला. या सगळ्यातून मला सुटका हवी आहे मी गेल्यावर माझे डोळे मी चिंगीला देऊ इच्छिते‌.

हे काही मी तिच्यावर दया म्हणून नाहीतर माझा आत्मक्लेश कमी करायचा प्रयत्न आहे , जर माझ्या डोळ्यांनी चिंगीला पाहता आले तर माझ्या मृत आत्म्याला शांती मिळेल.” काकूंच्या बरोबर माझे हे डोळे भरून आले.
सर्व ऐकून मी जडवत झाले, पण हे सर्व मी मनातच ठेवले  व बाहेर डॉक्टर साहेबांना काकूंची शेवटची इच्छा सांगितली.
त्यांनी फॉर्मवर काकूंची सही घेतली .
दोन दिवसांनी सुनंदाचा सकाळी फोन काकू गेल्याचा आला.

आज दोन महिन्यांनी समीरचा फोन “चिंगी चा वाढदिवस आहे तुला नक्की यायचे आहे”.
मलाही चिंगीला पहायचे होते.
तिला पाहून वाटले तिच्या डोळ्यातून काकूंचा भास होत आहे.
*****
©️ सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!