गुपित ( भाग 1)

©समीर खान
अप्पासाहेब अस्वस्थपणे बाहेर येरझर्या घालत होते. प्रसंगच तसा होता. त्यांची बायको लक्ष्मी तिसर्‍यांदा गर्भाने होती. दोन बाळंतपण सुखरूप झालेले असले तरी तिसर्‍या गर्भासाठी शरीर तयार नव्हते.
वैद्याने आधीच कल्पना दिलेली होती. दोन दिवसांपासून भयंकर त्रास झेलत व शेजारच्या गावातून जाणत्या सुईणीला आणूनही लक्ष्मी बाळंत होत नव्हती.
लक्ष्मी माई म्हणूनच सर्वत्र परिचित होती. तशी बैलगाडी तयार करून ठेवली होती तालुक्यातील दवाखान्यात नेण्यासाठी मात्र बाळ बाळंतिन दोन्हींच्या जीवाला धोका होता म्हणून ते खोळंबले होते. लक्ष्मीच्या गुरासारखं ओरडण्याच्या आवाजागणिक अप्पांची काळजी वाढत चालली होती.

आजूबाजूच्या बायका मदतीला होत्याच. मनु ही आलेली होती. अप्पासाहेबांची बहिण! शेजारच्या बाया कंटाळून निघून गेल्या होत्या. आत फक्त सुईण,मनु व लक्ष्मीच होत्या. संध्यासमयी बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि अप्पांचा जिव भांड्यात पडला. तरीही बाहेर आलेल्या सुईणीच्या तोंडावर काळजी दाटली होती.
मागोमाग मनु ही बाहेर आली. बरेचसे पैसे व धान्य देत तीला काहीतरी दटवत होती. आता तिचा स्वभावच तसा होता हे माहित असल्याने अप्पांनी जास्त लक्ष दिले नाही.
तरीही लक्ष्मी कशी असेल म्हणून ते न रहावून आत जाऊन आले. बाहेर आल्यावर त्यांच्याही कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मनुने डोळ्यानेच ईशारा करत अप्पांना शांत राहण्यास सांगितले.

अप्पांचे आणखी होते तरी कोण? बाराव्या दिवशी नामकरण विधीसाठी यथासांग सर्व सोपस्कार मनुच पार पाडत होती. काही मोजकी खास आप्त बोलवले होते. कदम कुटुंबात हा तिसरा पाहुणा होता. मोठा मुकुंदा, त्यापाठची नयना बाळाशी खेळत होते. मलमली दुपट्टयात लपेटलेले ते गोरेपान बाळ, ईवले ईवले हात पाय,मोठ्या लोभस डोळयांनी टकामका इकडेतिकडे पाहत होते.
ऐन विधीच्या आधी मनुआत्या व अप्पा वरच्या खोलीत काहीतरी गुढ वार्ता करताना मुकुंदाने पाहीले. माई चिंतेत दिसत होती. काहीवेळाने माईकडून बाळाला घेत मनुआत्या जमलेल्या मंडळी मध्ये आनंदाने सामील झाली.

पाठोपाठ माई व अप्पाही आले. गोविंद घ्या बाई गोपाळ घ्या म्हणत मनुआत्याने कुर्रर्र करत बाळाचे नाव ठेवले ‘माधव’. मुकुंदाचे नावही मनुआत्यानेच ठेवले होते. मनुआत्या निस्सीम कृष्णभक्त होती. सर्व सुरळीत झाले असता नेमकं बाळानं शू केल्यानं माईची बहीण त्याचा दुपट्टा बदलण्यासाठी पुढे सरसावली. दुपट्टा खोलणार ईतक्यात मनुआत्याने फर्रकन बाळाला घेतले. 
“पाहुण्यांनी पाहुण्यासारखं रहावं ” म्हणत घाऱ्या डोळयांचा जळजळीत कटाक्ष टाकला. 

“आवं पर.. ” म्हणत मावशी रडतच परत निघाली. माई मागोमाग डबडबलेल्या डोळयांनी तीला थांबवत होती पण कुणीही थांबले नाही. 
” जप गं माई लेकराला, ते घारे  डोळे टपून बसलेत माधवावर. दोन्ही मुलीच तर आहे तिला. “
” अक्के काहीबाही बोलू नको ,समदं कळतं मला ” माई ठामपणे बोलली. 
“आस्सं, बघ तू, न्हाई ती माधवाला संगत घेऊन गेली तर काय.. ” म्हणत मावशी निघून गेली.  
 गतकाळातील घडलेल्या घटना झरझर अंथरूणाला खिळलेल्या माईच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. 

” मुकुंदा, म्या ईथेच मरणार रं सुखाने. मला न्यायचा आग्रह नको करूस बाळा .किती दिवस ऊरलेत रे माझे. १२ वरसाची होते मी, जवा तुझ्या अप्पांसोबत लग्न करून या घराचे माप वलांडले होते. ईथेच माझी ह्यात गेली रं. संसार झाला. तुझ्या अप्पांच्या आठवणी या घराच्या कोपर्‍यानंकोपर्यात रूजल्यात रं. तू , नयना, माधव…. ” 
माधवाचे नाव घेताच माईच्या अश्रूंचा बांध फुटला. शब्द कंठातच गोठले व कृश शरीर थरथर कापू लागले. माईची अवस्था पाहून मुकुंदाचेही डोळे पाणावले. 
” माई, अगं बरी होशील तू  , काही होऊ देणार नाही मी तुला. डॉक्टर काकांना निरोप पाठवलाय. येतीलच ते ईतक्यात. “

“माधव…….. ” माईच्या तोंडून इतकेच अस्पष्ट ऊच्चार बाहेर पडत  होते. 
मुकुंद, मुकुंदाची बायको, मुले,मुली, नयना, जावईबापू ,नातू , मामा, मावशी सर्व नातलग मंडळी त्यांच्या जुन्या घरी जमा झाले होते. माईंची तब्येत नाजुक होती. माधवामध्ये माईचा जिव अडकला होता. अप्पांला जाऊन बरीच वर्षे झाली होती. तरी फक्त माईचा हट्ट म्हणून जागा कमी पडत असूनही मुकुंद माईच्या देखभालीसाठी परीवारासमवेत जुन्या घरीच थांबले होते.
नविन फ्लॅट घेतला असतानासुद्धा ते तिथे राहण्यास अजून गेले नव्हते. यावरून त्यांची बायको व मुले नाराजीतच होते व सारखा त्यांच्या मागे इथून जायचा धोशा लावत होते.

माईंना सोबत नेण्यासाठी त्यांची काहीच हरकत नव्हती ऊलट आग्रहच होता. मात्र माई जुने घर सोडून जाण्यास राजी नव्हत्या. पर्यायाने मुकुंदानाही तिथेच थांबणे भाग होते. 
“नयना, अगं माईला समजावून सांग तूच. मनुआत्या येईलच थोड्याच वेळात. माईने सारखा माधवच्या नावाचा जप लावलाय. ” मुकुंदा काळजी करत नयनाला बोलले. 
” येऊदे की दादा, पूर्ण हयातीत कधी त्याचं नाव घेऊ दिलं नाही माईला. अप्पांनीही आणि आत्यानेही. आता आपण लहान राहीलो नाहीत. मिंधे नाही आपण कुणाचे. मनुआत्या जर आता काही बोलली ना मी तरी ऐकून घेणार नाही सांगून ठेवते आताच. ” नयना डोळे पुसत घोगर्या आवाजात बोलली. 

“अगं धीराने घे पोरी, प्रसंग काय आहे ते तरी पहा. ” मावशी नयनाला समजावत बोलली. 
” अगं पण माधवाला कुठे शोधायचं आता. किती वर्ष लोटली त्याला जाऊन. कुठे असतो, काय करतो कुणास ठाऊक? अप्पांच्या वेळी  अचानक वेळेवर ऊगवला होता तो विधीच्या वेळी .कशी त्याला भनक लागली होती माहीत नाही. आताही असाच काहीसा चमत्कार घडो व तो येवो याशिवाय आपण काय करू शकतो? कुणाशी ब्र शब्द ही बोलला नव्हता तो त्यावेळी. त्याचा पत्ता कसा माहित करणार मग? ” मुकुंदाची काळजी क्षणा क्षणाला वाढत होती. 

” बाबा, मनुआजी आली वाटतं. गाड्या आल्यात त्यांच्या “. मुकुंदाचा मोठा मुलगा बोलला. हे ऐकून मुकुंदा स्वतः त्यांना घेण्यासाठी बाहेर आले. ईतर सर्व आले होते पण मनुआत्या कुठे दिसत नव्हती. 
” ताई, आत्या गं ? ” मुकुंदाने गाडीतून ऊतरत असलेल्या आत्याच्या मुलीला विचारले. 
” अरे, आई येतेच आहे दुसर्‍या गाडीतून. आम्ही आधी आलो होतो. तुला माहितीये ना आईला प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाही. म्हणून आम्ही काहीच विचारलं नाही. “
“बरं, बरं.. या.. ” 

तोपर्यंत डॉक्टर काकाही आले होते. 
” मुकुंदा, आपण सर्व ऊपचार आधीच केलेत हाॅस्पिटलमध्येच. तुला कल्पना आहेच. इंजेक्शन दिलंय मी पण… “
” माधवाला तेवढं बोलवं… ” डॉक्टर काका अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे होते. अप्पांचे खास मित्र होते. कदम कुंटुंबियांबरोबर कित्येक वर्षांचे ऋणाणुबंध होते त्यांचे. मुकुंदाची पाठ थोपटत ते निघून गेले. 
आता मात्र मुकुंदाचा बांध तुटला. पन्नाशीतले  मुकुंदा ओक्साबोक्शी लहान मुलासारखे रडू लागले. माई म्हणजे जिव की प्राण होती मुकुंदा साठी. अप्पा गेल्यानंतर माईनेच सर्वांना वाढवले होते. सर्वांना काय हवं नको ते पाहीलं होतं.

गुरं, ढोरं, दुधदुभतं ते प्रसंगी शेतात राबण्यासही कधी कचरल्या नव्हत्या माई. मुकुंद सर्वात मोठा. त्यानंतर नयना व सर्वात धाकटा माधव. अप्पा श्रीमंत आसामी नसली तरीही गावात चांगला मान होता त्यांना. खुप मोठा वाडा जरी नसला तरी दुमजली जुन्या खणाचं घर होतं त्यांच. उदरनिर्वाह पुरती शेती व काही जनावरं. तरीही अगदी दृष्ट लागल असा अप्पा व माईंचा जोडा होता. धोतर, सदरा घालणारे अप्पा काळ्या मातीत राबून कणखर झाले होते. तर डोईभर पदर, नाकात मोठी नथ, खण, नऊवारी साडी, हातभर बांगड्या व कपाळी मोठ्ठं कुंकू व तितकाच मायाळू स्वभाव.

चटणीभाकर जरी असली तरी घासातला घास वाटून खाण्याचा स्वभाव. असं जरी असलं तरी स्वाभिमानी व ईज्जत हीच दौलत ही शिकवण. मुकुंदा, नयना, माधवास काटकसरीने संसार करून शिक्षण दिले होते. याच मेहनतीने फळ म्हणून सर्व स्थिरस्थावर झाले होते व नयनालाही मोठ्या घरात थाटामाटात लग्न लावून दिले होते. सल एकच होती. माधव. 
” धीर धर मुकुंदा, आरं समद्यात थोरला तू असं हार मानून कसं चालल? माईंनी तुझा आवाज ऐकला तर अजून तरास करून घेत्यानं. ” मामा मुकुंदास समजावत बोलले. 
” कसं धीर धरू मामा, आता माधवाला कुठं शोधू मी ऽऽऽऽ कुठून आणून देऊ माईचा माधव बोल ना ऽऽऽ…मीच त्याला या हाताने बाहेर काढलं होतं घरातून. अप्पांपुढे काय चालणार होतं माझं? त्यानं कामच तस केलं होतं. त्याच्या चुकांवर पांघरूण तरी कसा घालणार होतो? ” टपटप टपटप टपोऱ्या अश्रूंच्या थेंबागणिक एक एक आठवण काढत मुकुंदा रडत होते. 

“आरं, पर ह्यात तुझी कायबी चूक न्हाई बघ. दाजींचा फैसला होता माधवाला घराभाईर काढायचा. त्यात तू मनाला लावून घेऊ नगं ” मामा मुकुंदाला बोलले. 
पूर्ण प्रकरण कुणालाच ठाऊक नव्हते. अगदी मुकुंदाच्या बायकोलाही नाही. हीच सल मुकुंदाला आतून पोखरून काढत होती. शेतीच्या पैशात फेरफार केल्यानं अप्पांनी माधवाला घराबाहेर काढलं हेच कारण सर्वांना माहीत होते. मात्र अप्पा, माई व मुकुंदालाच नेमकं माधवाला घराबाहेर का काढले हे माहित होते.
अप्पा कधीच काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यांच्यासोबत त्यांना ते माहीत असलेले कारणही लुप्त झाले होते. तर माईची अवस्था ही अशी. माईंच्या त्याला अशा आठवण्याने आज ईतकी वर्षे लोटून भरलेली ती जखम  पुन्हा भळभळती झाली होती. माईची इतकी क्षुल्लक इच्छा ही आपण पूर्ण करू शकत नाही याचे दुःख मुकुंदाला जास्त होत होते.

कुठून आणून देणार माईचा माधव? कुठे शोधायचं आता त्यास ? ज्यास भर्यापुर्या घरातून हात पकडून बाहेर काढले, तो कुठे जाईल? कुठे राहील? कशाचीही पर्वा न करता इतकी वर्षे त्यास जाणूनबुजून विस्मृतीत ठेवले, आज त्याची निकड भासताच तो आठवला? वाह..!! मुकुंदाच मनोमन चाललेलं द्वंद्व अधिकाधिक कर्कश होत होतं. 
आतल्या खोलीतून रडारडचा आवाज कानी पडताच मुकुंदाच्या काळजात धस्स झालं. पटापट सर्व पुरूष मंडळी आत धावली.  मुकुंदाने जोरात टाहो फोडला. सर्वजण ते पाहून गहिवरले . सर्व जण असूनसुद्धा माईचे अर्धोन्मिलित थकलेले डोळे सर्व प्राण एकवटून माधवची वाट पाहत होते. अखेरची घटका मोजत असतानाही शेवटचं माधवंला पाहण्यासाठी माई तगून होत्या. 
” मुकुंदा…. म…. नु… ” अगदीच अस्पष्ट असे शब्द माई बोलत होत्या. 
इतकावेळ माधवाची आठवण काढणारी माई अचानक मनुआत्या चं नाव घेताना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. 
क्रमशः
माई ज्याच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या तो माधव येईल का? मुकुंदाने का काढलं होतं माधवला घराबाहेर? काय होतं माई आणि मनुआत्याचं गुपित? वाचा उद्याच्या शेवटच्या भागामधे..
©समीर खान
सदर कथा लेखक समीर खान यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Leave a Comment

error: Content is protected !!