एक दागिना असाही

© अनुजा धारिया शेठ
सान्वी लहान असल्या पासूनच खूप हट्टी होती.. आई विना पोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे, आजीची तर ती खूपच लाडकी होती…
बाबांचे दुसरे लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता… पण हि ७ वर्षाची चिमुरडी काही ना काही करून मोडून काढत होती… 
दोन्ही आजी बाई समजावून दमल्या तिला, “अगं सगळ्याच सावञ आई काही खडूस नसतात.. आणि आम्ही आहोत ना तूला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू.”

पण सान्वीच्या मनात सारखी भीती होती…. पिक्चर मध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देईल… बाबा पण तिचेच ऐकतील… अन तीच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचे मंगळसुत्र, तें पण त्या आईला देतील असेच तिला वाटायचं..
सर्वांनाच काळजी वाटत होती, हिला कसे समजावून सांगावे? 
सान्वीची आई, म्हणजे सविता एका अपघातात दोन वर्षापुर्वी गेली.. तेव्हा पासून सान्वीला सर्व जण जपत होते, पण आता तीचा हा हट्ट म्हणजे जरा अतीच होता.. कसे सांगावे? आता हिला..

सान्वीच्या आजीने म्हणजे बाबांच्या आईने, तिच्याच मावस भावाची मुलगी पसंत केली, तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता, तिला एक मुलगा होता.. पण ही चिमुरडी ऐकायला तयारच नाही.. तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणाऱ माझे नाही.. हा एकच हट्ट धरून बसली.. तिच्या हट्टापुढं सतीश पण नाही म्हणाला..
दोन्ही आजी अजून चिंतेत गेल्या… शेवटी सविताच्या आईनं तोडगा काढला.. सविताची एक मैत्रीण वय वाढलेले होते, त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हते.. तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्तिथी सांगितली..

तें सर्व ऐकले तरी सुषमा लग्नाला तयार झाली.. त्यामुळे दोघी आजीबाईंना बरे वाटले.. 
आता सतीश काय म्हणतोय? म्हणुन त्यांना काळजी वाट्त होती.. 
सासूबाई बोलतायत म्हणून जावई तयार झाला मुलीला भेटायला…
सतीशने सुषमाची भेट घ्यायची ठरवली, अन फ़क्त सानुच्या भविष्यासाठी, आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे.. माझ्या कडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको.. असे त्याने आधीच सांगितलं..

सुषमाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं.. पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली..
लग्न झाले.. तिच्या घरची काहीच परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही.. अन सान्वीने आपल्या आईच मंगळसुत्र काही दिले नाही.. 
शेवटी सविताच्या आईनेच तिची आई होऊन सर्व काही केले..

सान्वी तिला खूप त्रास द्यायची, ए दुसरी आई, अशीच हाक मारायची.. ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची..
सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला.
दोन्ही आजींना आधी पासूनच माहीत होते… त्यामुळे त्या सुषमाला काहीच बोलायच्या नाहीत.. त्या उलट तिला म्हणायच्या मारलीस तरी चालेल… पण सतीशला  मात्र अजिबात सहन व्हायचे नाही…
सुषमाने मग् तिच्या मैत्रीणीला म्हणजे सान्वीच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला.. अन सतीशला खर्‍या परीस्थीतीची जाणीव करून दिली.

त्याने त्या दोघींचे आभार मानले अन गोड बोलुन सान्वीला योग्य शब्दात समज दिली..तसच या पुढे तिने सुषमाशी नीट वागायचं, तिचे ऐकायचं असे कबुल करून घेतले.
सान्वीने खूप तमाशा केला.. पण तिची बाजू घेणार कॊणी नाही हे तिला आता समजले होते, 
सुषमाचा खूप राग यायचा तिला..

सुषमा तिला खूप समजून घेत असे, हळू हळू सुषमा आणि सतीशचे नाते पण फुलत होते.
पण नवरा-बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते.. आणि तें सतीशने तिला आधीच सांगितलं होते.. 
सुषमाला खूप वाईट वाटायचं, पण तिने तिच्या अपेक्षा मनात तश्याच ठेवल्या.
सान्वीलाही कधी सावत्रपणा दाखवला नाही..
पण सान्वी मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालायची.

हळू हळू सान्वी मोठी होत होती.. सतीश कामानिमित्ताने सतत बाहेर असायचा.. सुषमा मात्र सान्वीसाठी नेहमीच तत्पर असायची.. तिने सान्वीला खूप प्रेमाने समजावयचा प्रयत्न केला, पण तो नेहमीच अयशस्वी ठरला.
त्यात सतीशची आई आजारी असायची, त्यांची पण ती काळजी घ्यायची…. त्यांनी एकदा सुषमाला बोलावून सांगितल, मला खूप काळजी होती बघ ह्या सानुची… पण आता नाही.. तू आहेस, आता माझे काही झाले तरी चालेल.. पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटत.. ह्या पोरीसाठी तू एवढे करतेस.. त्याची तिला किंमत नाही..  

सुषमा हसत म्हणाली, “तिला नक्की कळेल एक दिवस..  मला पूर्ण विश्वास आहे.”
सान्वी सर्व ऐकत होती, तिने चुकीचाच अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली… सतीश घरी आल्यावर त्याला उलट सुलट सांगितलं.. पण त्याने सुद्धा सानुला सुनावले.
रागाने ती जेवली नाही..  म्हणुन सुषमा सुद्धा जेवली नाही.
तिची समजून काढायला गेल्यावर तिने सांगितल, “मला तुझ्या आईची जागा नको, तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसुत्र पण नको.. मला फक्त तू आई म्हणून स्वीकार.. ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातॄत्वाचा दागिना मिळेल… तोच माझा खरा पहीला दागिना.”

पण ऐकेल ती सानु कसली..?? आहे तसेच चालु राहिले..
काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली, तिने सतीशला बोलवले आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला.
“सुषमा खूप चांगली आहे, ती कधीही भेदभाव करणार नाही.. तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर.. तिच्याही  काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर”. असे सांगून आजीनं निरोप घेतला…
आईचे शब्द सतीशच्या कानात घुमत होते.

महिना झाला तरी तो त्याच गोष्टींचा विचार करत होता…
गॅलरीत शांत बसला होता.. तेवढ्यात सुषमा जेवायला येताय ना म्हणून बोलवायला आली. त्याचा बांध सुटला.. तीच्या मांडीत डोक ठेवून तो खूप रडला.. 
आज ५ वर्षांत पहिल्यांदाच त्यांने तिला स्पर्श केला होता… सुषमा गोंधळून गेली.. तेवढ्यात सानु आली, त्यामुळे तो विषय तिथेच राहिला..
काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले, दोघेही आता शरीराने, मनाने जवळ आले होते. 
सान्वीला समज आल्यापासून ती हि जरा बरी वागत होती..

आता तिची १२ वीची परीक्षा त्यामुळे सुषमा तिचे टाइम टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती.. एकूण काय सर्व छान चालू होते.. अशात दॄष्ट लागली.
सतीशचा अपघात झाला आणि त्यातच तो गेला.
आता सुषमा आणि सान्वी दोघी होत्या एकमेकींसाठी. जे काही सेव्हींगस होते त्यावर चालु होते. सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती.. त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला.

छोटी- छोटी नोकरी करत ती घरखर्च चालवत होती.
सतीशचे सर्व सेव्हींगस तिने सानूसाठी ठेवले.
सानुचे प्रेम होते.. त्यामुळे तिने सुयश सोबत प्रेमविवाह करायच ठरवलं.. 

सुषमाने कसलीही आडकाठी केली नाही.
सर्व चांगले आहे, सानु खुशीत राहील असा तिला विश्वास वाटला…
पण त्याची आई जरा खडूस होती..  त्यात सतीश गेल्यामुळे ह्यांची परिस्तिथी जेमतेम होती.. कोणताही बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले, त्यात सान्वी येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व तिला हीणवत होते.
सान्वीच्या सासूच्या मैत्रीणीं तीच्या सावत्र आईला नाव ठेवत, सावत्र आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल, सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे हे मंगळसुत्र घालून पाठवले.. म्हणत कुत्सितपणे हसू लागल्या.

आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला.
“माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसुत्र आहे.. जे माझी इच्छा होती की मीच घालावे, तिचा आशिर्वादाचा हात आहे ह्यामध्ये… अन माझ्या सुषमाई ला नाव ठेवायचा तुम्हाला काही अधिकार नाही… आज ती आहे म्हणून मी आहे.. तिने मला योग्य संस्कार दिले, शिस्त लावली.. संयम, व्यक्तशिरपणा, मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या.

बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमावलेला एक पैसाही तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले.. कधीच सावत्रपणा तिने मला दाखवला नाही.. तो कायम मी तिला दाखवत आले.. माझ्यासठी तीने तीची कूस न उजवण्याचा निर्णय घेतला.. पण मला वेडीला कधी कळलेच नाही… तिने मला फक्त फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती.. एक दागिना तिला हवा होता, जो मी कधीच देऊ शकले नाही.”
सगळ्या बायका अगदी उत्कसुतेने विचारू लागल्या कोणता दागिना ग..??

नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना.. म्हणुन तर तिने एवढ अड्जस्ट केले असेल.. कुजबुज सुरू होती तेवढ्यात तिथे सुषमा आली. बायका अजून कुजबुजत कुत्सितपणे हसु लागल्या..
सुषमा मनातून घाबरून गेली.. सानुने काय केले? असे काय वागली कि ह्या बायका अशा बघतायत… तेवढ्यात सानुने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली.. 
दोघी मायलेकी सगळं विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या.

बायका कुजबुजत असताना सानु म्हणाली, “तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना? हाच आई म्हणून हाक मारुन माझ्या दोन्ही हातांची तीच्या भोवती असलेला हार हाच मातॄत्वाचा दागिना तिला हवा होता.”
सुषमाला तर भरून येत होते… दोघींनी सतीश आणि आजीच्या फोटो समोर उभे राहून त्यांना नमस्कार करत होत्या. 
सानुने त्यांची माफी मागितली अन आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले…
आज फोटोमधुन आजी आणि सतीश खऱ्या अर्थाने हसले.
© अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!