ऋणमुक्ती

© सौ. प्रतिभा परांजपे
अक्षरा आहेराचे सामान पॅक करत होती, तेवढ्यात आईचा फोन आला.
” झाली का तयारी लग्नाला जायची?”
” हो, आणि आई तुझी ?”
“अग –मला नाही जमणार. मी तुला मागे म्हणाले होते ना, नेमका रेखाला आठवा महिना लागलाय आणि त्यातून तिची ही पहिली वेळ, नाजूक प्रकृती. त्यामुळे उगाचच तिला त्रास होईल आणि माझेही मन लागणार नाही. इतके दिवस जपले तिला आता थोडक्या करता कशाला?”

मी सुनंदाला कळवले आहे. तू जाते आहेस माझी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असे समज. नंतर पुढे मी रेखाची डिलिव्हरी झाल्यावर जाईन  सुनंदाकडे. बरं, परत आली की फोन कर “म्हणून आईने फोन ठेवला.
सुनंदा मावशीच्या मुलाचे लग्न म्हणून अक्षरा जाणार होती.
मागे मावशीचे मिस्टर वारले तेव्हा ती भारतात नव्हती . त्याआधी काही महिने आधी मावशीचे मोठे दीरही वारले.
अशा दोन दुःखद घटना घडल्या पण अक्षरा भेटायला जाऊ शकली नव्हती.

नंतर मावशी एकदा आईकडे राहायला म्हणून चार दिवस आली  तेव्हा तिची भेट झाली .
आईचे मावशीला म्हणणे असायचे” “सुनंदा इतका सरळपणा बरोबर नाही तुझ्या या स्वभावाचा सगळे गैरफायदा घेतात.”!
मावशी खरोखरच साधी सरळ होती. लग्न झाले ते एकत्र कुटुंबात.
सासूबाई नव्हत्या पण सासरे, मोठे दीर,जाऊ त्यांची एक मुलगी, सुनील दादा व मावशी. येवढी माणसं.

मावशीच्या सासऱ्यांचे कपड्याचे मोठे  स्वतःचे दुकान होते. त्यातच दोघ भाऊ काम करत.
दोघा भावांमधे अगदी राम लक्षम्णासारखे प्रेम.
मोठे सुधीर दादा हुशार आणि चतुर होते.
सुनील हुशार  पण सरळ स्वभावाचे. मावशी  व सुनील दोघं अगदी एकाच स्वभावाचे.
मावशीच्या जाऊ बाई  छायाताई महा लबाड, जहांबाज  म्हणा ना.

मोठी सून असल्याचा त्यांना जणू माज होता.
प्रत्येक गोष्टीत मी आणि माझा नवरा कसे हुशार कर्तबगार असा टेंभा मिरवायच्या आणि मावशी व सुनील दोघं त्यांच्याच कृपेवर  या घरात रहातात असा त्यांचा अविर्भाव असायचा. 
मावशीला दोन मुलं होती , छायाताई ना एकच मुलगी त्यामुळे त्यांचा खर्च  कमी असे छाया  ताईंच्या बोलण्यात नेहमी असायचे.
मावशी साधी सरळ म्हणून त्यांच्याशी जुळवून घेत होती.

पण सासरे गेले त्यानंतर काही कारणाने तिच्या जावेने त्यांना वेगळे घर करायला भाग पाडले.
मावशीचा वेगळा संसार सुरू झाला तिने व सुनील दादांनी खूप मेहनतीने तो केला दोघं मुलं चांगली शिकून नोकरीला लागली.
लग्न खूप थाटात पार पडले.
पण एक गोष्ट मात्र अक्षराला कळत नव्हती.
सुनील दादा व त्यांचे भाऊ दोघेही आता या जगात नाहीत. 

तेव्हा जावेने मावशीला वेगळे घर करायला भाग पाडले पण आता तिच्या जाऊ बाईही त्याच घरात राहत होत्या.
हे कसे काय?
पूर्ण लग्नात मावशी पेक्षाही त्यांना मान जास्त होता.
प्रत्येक प्रसंगात मावशी त्यांना पुढे करत होती अगदी विहिणींचा मान, सुनमुख सगळं त्यांच्याच हाती झालं.
अक्षराला याची काहीच सुसंगती लागत नव्हती.

कदाचित काकूंना मुलगा नाही म्हणून ही असेल पण तरीही मावशीचाही हा पहिलाच मान होता, तो तिने का त्यांना दिला??
लग्नानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरा रात्री मावशीच्या खोलीत झोपायला गेली.
” लग्न खूपच छान झालं मावशी. सून  छान आहे तुझी. हे दोघे मुंबईला राहणार तू इथे एकटीच?”
“एकटी नाही ग– जाऊ बाई आहेत ना सोबत!”
” कां? त्यांचे घर आहे ना मग ??”

 “ते भाड्याने दिले आहे!’
“मला कळत नाही मावशी इतकं सगळं होऊनही तू इतकी चांगली कशी वागू शकते? मी नसत सहन केलं!”
” खरं आहे ग तुझं पण जसं दिसतं तसं नसतं काही कर्तव्य असतात!”
“त्यांनी काय  केलंतुझ्यासाठी  पण?”
“तुला काही गोष्टी माहित नाही. सांगते–

“आमचे लग्न झाले मी या घरी आले. हे व यांचे मोठे भाऊ सुधीर भाऊजी दोघं मिळूनच बाबांचा बिझनेस म्हणजे कपड्याचे दुकान सांभाळत .खूप छान चाललं होतं दुकान .
सुरुवातीला भाऊजी व बाबा बरोबर काम करत मग काही वर्षांनी हे पण त्यात गुंतले.
वर वर दिसायला सर्व छान होते पण यांचा स्वभाव साधा सरळ. भाऊजी मात्र चाणाक्ष.
व्यवसाय करताना जी व्यवहार कुशलता हवी ती त्यांच्यातच होती. त्यामानाने हे खूपच सरळ होते.

पण तरीही भाऊजी यांना संभाळून घेत असत. बरेचदा समजावत.”
यांच्या अशा स्वभावामुळे वहिनींना फावत असे त्या आडून आडून टोमणे मारत, ते  ह्यांना समजत पण यावर काय मार्ग काढावा कळत नसे. पुढे सासरे  वारले आणि परिस्थिती बदलली. वहिनींनी आता सर्व सूत्र हातात घेतली.
शेवटी भाऊजींनी यांना सुचवले तुम्ही दोघं वेगळं घर करून रहा तरच सुखात रहाल.

आमचं वेगळं घर झालं. सुरुवातीला आर्थिक चणचण होती पण भाऊजी खूप चांगले त्यांनी एक छोटे दुकान यांना काढून दिलं.
आता आमची जी मिळकत होती ती आमच्या कष्टाची होती. तो एक दिलासा होता.
मी दुकानात जे  कटपीस उरत त्यातून कपडे शिवून विकायला ठेवू लागले, त्यातूनही मिळकत व्हायची. 
मुलं समजुतदार निघाली त्यामुळे निभावले. मुलांचे शिक्षण पार पडली व दोघ नौकरीला लागली.

तिकडे दिरांच्या मुलीचे लग्न थाटात पार पडले. ती बाहेर देशात गेली.
अचानक परिस्थिती बदलली.
यांची तब्येत बरी नसायची, काही कळत नव्हतं काय होतंय.
बऱ्याच तपासण्या झाल्या आणि ह्यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत असे कळले.
नेमक्या छाया वहिनी त्यावेळी मुलीच्या बाळंतपणा करता चार महिने यु. एस. ला गेलेल्या होत्या.
भाऊजी इथेच होते, ते जेवायला इकडे येत असत.

यांचा रिपोर्ट आला आणि आम्ही सगळेच घाबरलो.
तातडीने कोणी डोनर मिळायला हवा आणि त्याकरता पैसाही भरपूर हवा. काय करावे याच विवंचनेत आम्ही होतो.
एक दिवस भाऊजी आले ते म्हणाले, मी तुला देतो माझी एक किडनी मी सगळ्या टेस्ट करून आलो आहे.
हे तयार नव्हते, मुख्य म्हणजे वहिनी ही इथे नव्हत्या ,त्यांना न विचारता असं काही करणं यांना पटत नव्हते.

त्यावर भाऊजी म्हणाले” तिला विचारले तर ती कधीच हो म्हणणार नाही. पण मला तू हवा आहेस.”
हे तयार होत नाही पाहून म्हणाले” बाबा गेले तेव्हा त्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली. ती मला पार पाडू दे. तुला काही झाले तर? आणि एक, ही गोष्ट आपल्यातच राहू दे, हिला कळू देऊ नको .”
आता यांचा नाईलाज झाला. भाऊजींची एक किडनी यांना सूट झाली.
यांची तब्येत हळूहळू सुधारली भाऊजी पण व्यवस्थित होते.

चार महिन्यांनी वहिनी परत आल्या. सर्व छान चालले होते.
असेच एक वर्ष गेले आणि अचानक भाऊजींना त्रास व्हायला लागला दवाखान्यात ऍडमिट केले पण काही फायदा झाला नाही ते गेले.
आम्हा सर्वांनाच तो मोठा धक्का  होता, सहन होण्याच्या पलीकडे . वहिनींच  दुःख  पाहवत नव्हत,.
पण त्याहीपेक्षा सुनील शॉक मध्ये होते.
दादांचे दिवस वार झाले, सुनीलच्या मनात एक अपराध भाव जागा झाला  होता.

‘माझ्यामुळे दादाचा जीव गेला. मला जीवदान देऊन तो गेला’  ही भावना त्यांचे मन कुरतडू लागली.  
ते खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू लागले. कामातही मन लागत नव्हते. सतत स्वतःला अपराधी मानत. 
त्यांचे दुःख मनात खोलवर रुजले होते आणि त्यातून ते बाहेर येऊ पाहत नव्हते.
एक दिवस अचानक ते वहिनींना घेऊन इकडे आले व आता एकट्या राहू नका इथेच राहा म्हणून आग्रह धरू लागले.

वहिनीही एकटेपणाला कंटाळल्या होत्या. त्या तयार झाल्या.
जायच्या आधी एक दिवस हे मला  एकांतात म्हणाले “दादाने आपली किडनी देऊन माझा जीव वाचवला. त्याचे ऋण मी फेडू शकत नाही म्हणून वहिनीला सांभाळून ते फेडायचा प्रयत्न करतो आहे, तू मला साथ देशील ना ??”
नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता. त्यांच्या मनाची थोडी तरी तगमग कमी होईल असे मानून मी होकार दिला, आणि  काही दिवसांतच  हे गेले.

आता दिलेले वचन मी पाळते आहे बाकी काही नाही आणि आता वहिनींचा स्वभाव ही पूर्वीच्या मानाने बराच निवळला आहे.”
हे सगळं ऐकायला खूपच विचित्र होते, ..
पण शेवटी “ऋणमुक्तीचा” हा एकच उपाय होता जो आता मावशी  निभावणार आहे. शेवटपर्यंत…
समाप्त
**********
© सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!