त्याचा अहंकार

© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
हि कथा सत्य घटनेवर आधारीत आहे 
सांगली मधल्या एका दुर्गम गावातला एक हुशार मुलगा नीरज, घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबईत जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या नेहल बरोबर त्याची मैत्री होते.
नेहल त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची त्याला मूकसंमती सुद्धा आहे.
नीरज तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्यावेळची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणी गरज ओळखुन नीरज आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही. पण तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग नेहलला प्रपोज करायचं.

थोड्याच दिवसांत नीरजला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागते.
नीरज आनंदाने ही बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे नेहलला मागणी घालण्यासाठी म्हणून तिच्या घरी जातो.
पण त्याला आता फार उशीर झालेला असतो. 
नेहलचे आजारी वडील अचानक दगावल्यामुळे जवळपासच्या वडिलधाऱ्या नातेवाईक मंडळींकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणून ओळखीतल्याच एका पुण्यात राहणाऱ्या मुलाशी तीच जबरदस्तीने लग्न ठरवल जातं. नाईलाजाने नेहलला लग्न करणं भाग पडतं.

लग्न करून नेहल पुण्याला निघून जाते. यागोष्टी इतक्या अचानकपणे घडतात कि त्याबद्दल नीरजशी काही संपर्क साधण्यासाठी तिला वेळच मिळू शकत नाही.
नीरज निराश मनाने घरी परततो, तो आता नेहलला विसरण्याचा प्रयत्न करतो. पण काही केल्या तिला विसरू शकत नाही.
लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरातून नीरजला सारखे लग्नासाठी पाठी लागतात. नीरज त्यांना खूप विरोध करतो पण त्याच्या पाठच्या भावंडांची लग्न व्हायची असल्यामुळे कसाबसा नाईलाजाने लग्नाला तयार होतो.
घरच्यांच्याच पसंतीने नात्यातल्याच  गीतांजली नावाच्या एक सुस्वरूप मुलीशी नीरज च लग्न करून देण्यात येतं.

नीरज नवीन संसारात फारसा रमत नाही. नुसताच संसारगाडा रेटत असतो, पण आपलं काम मात्र अगदी मन लावून करत असतो. त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसातच त्याची प्रमोशनवर पुण्याला बदली होते. साहजीकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन तिथे जाणं भाग पडतं.
हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी उगाचच फटकून वागतो. तिला समजूनच घेत नाही, प्रेमात अपयश आल्याचा राग आपण उगाच तिच्यावर काढतोय, तसं पाहिल तर यात तिची काहीच चूक नाहीय.
नीरज आता आपलं वागणं सुधारतो आणि गीतांजली बरोबर नॉर्मल वागू लागतो.

थोड्याच दिवसांत त्यांच्यात एक चांगलं पती-पत्नीच नातं निर्माण होतं. त्यातूनच त्यांना एक छान मुलगी होते.  
दोघांचाहि संसार व्यवस्थित चाललेला असतो.  दोघेही आपली सुख-दुख एकमेकांशी शेअर करतात.
नीरज एक दिवस मूडमध्ये येउन आपलं लग्नापूर्वीच  जमलेलं प्रेम व काही कारणांनी नेहल सोबत न  होऊ शकलेलं लग्न ही सगळी हकीकत गीतांजलीला सांगतो.
तीही सगळं निमूट ऐकून घेते. झालं गेलं विसरून जा,  मी आहेना तिची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही इतक मी इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन असा नीरज ला धीर देते.

नीरज आता गीतांजलीला आग्रह करतो कि तुला मला काही तुझ्या पूर्वायुष्यातली एखादी गुपित-गोष्ट सांगायची असेल तर सांग. गीतांजली सुरवातीला लाजते, नाही- नाही म्हणते. 
नीरज मात्र तिला सांगण्याची गळचं घालतो, कोणालाही न सांगण्याच आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो, त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो.
इतका विश्वास दिल्यावर गीतांजली सुद्धा आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट  म्हणजे तिचंही एका मुलाबरोबर प्रेम होतं पण आईने लग्नाला विरोध केल्यामुळे ती त्याला मुलाबरोबर लग्न करू शकली नाही हे नीरजला सांगते.

पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र नीरजचा पुरुषी अहंकार परत जागा होतो. तो ही गोष्ट पचवूच शकत नाही.
त्या दिवसापासून नीरज – गीतांजलीच्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो.
तो तिला टाळू लागतो, स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो, रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो.
सुट्टीच्या दिवशीदेखील घरात गीतांजली किवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहु लागतो, सारखा चिडचिड करतो, अशाच परिस्थितीत चार वर्ष निघून जातात.
नीरज च्या वागण्याने गीतांजली मनातून कोलमडते, त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो.
निरुत्साह आणी अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते.

तिच्या सततच्या कुरबुरीना कंटाळून नीरज आता तिला पूर्णपणे टाळू लागतो, सतत पाच-सहा दिवस, बाहेर राहू लागतो.
असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असताना गीतांजली नीरजला हाक मारते, तो तिच्याकडे दुर्लक्षचं करतो.
पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच अशक्तपणामूळे उठायला होत नाहीय, तेव्हा छोटीला आज तू जाताजाता शाळेत सोड, मग पुढे ऑफिसला जा.
नीरज चिडतो , नाही म्हणतो, ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो.
शेवटी गीतांजली त्याला विनवणी करते कि तुझा राग माझ्यावर आहे तर मग छोटीला यात कशाला ओढतोस, तिचा यात काय गुन्हा

शेवटी एकदाचा वैतागत नाईलाजाने तो छोटीला शाळेत सोडायला जातो.
शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते. फक्त मुलांनाच गेटमधून आत सोडलं जातं. पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात.
नीरज छोटीला घेऊन गर्दीत घुसतो आणि ती गेटमधून आत जाईपर्यंत पाहत राहतो.
ती सुखरूप आत गेल्यावर हुश्य करत गर्दीतून वाट काढत बाहेर येतो आणी तेव्हा त्याला त्या पालकांमध्ये ओझरता नेहलसारखा चेहरा दिसतो.

नीरज मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. नेहल सारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे नीरज अस्वस्थ होतो.
त्या दिवशी ऑफिसमध्ये देखील त्याच कामात लक्ष लागत नाही. तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या नेहल च्या आठवणींनी बेचैन जातो, रात्री नीट झोपत नाही व आता मनाशी ठरवतो की आता काहीही करून उद्या पुन्हा शाळेत जाउन खात्री करून घ्यायची की ती नक्की नेहलच होती कि दुसरी कोणी.
नीरज सकाळी लवकर उठून तयार होतो आणि स्वतःहून छोटी ला शाळेत सोडायला निघतो.
गीतांजली मनातून सुखावते.
नीरज आता शाळेजवळ पोहोचतो आणि पटकन छोटीला गेटमधून आत सोडतो आणि तिथेच नेहलच्या जवळ येण्याची वाट पहात राहतो.

इतक्यात नेहल आपल्या लहान मुलीला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते,  तिच्याकडे नीरज पाहताच राहतो.
नीरज काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात नेहल पटकन गर्दीतून वाट काढत निघून जाते. 
नीरज नुसताच पहात राहतो. मात्र आता पुन्हा वारंवार नेहलची भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो.
काहीही करून आता पुन्हा तिला भेटायचंच आणि आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायचीच असा विचार करून नीरज तिथून निघतो आणि नंतर जवळजवळ दोन-तीन दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाण्याने शाळेजवळ नेहलची वाट पहात राहतो. पण नेहल काही त्याला भेटत नाही.

चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलीला सोडायला आलेली नेहल दिसते. त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवीत होते.
हिम्मत करून  नीरज आज तिला काहीही करून तिला गाठतोच आणि नेहल अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो.
नेहल आता त्याला ओळख तर दाखवते, पण मोजकच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते.
इकडे  नीरज बेचैन होतो.
पुढच्याच दिवशी  नीरज पुन्हा शाळेबाहेर नेहल ला गाठतो आणि काहीतरी महत्वाच बोलायच आहे अस सांगून तिच्याशी फक्त पाचच मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त करतो. नेहल तिला वेळ नाहीय, उशीर झालाय, असं सांगून टाळण्याचा प्रयत्न करते.

इकडे नेहलची सुद्धा चलबिचल होते.  आपला लग्नापुर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना ? त्याला आपल्याशी काय बरं बोलायच असेल ?
आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलो त्याचा जाब तर त्याला विचारायचा नसेल ? की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल?
आता आपण एक विधवा, आपल असं एका परपुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसेल का ? कोणी पाहिलं तर काय म्हणेल ? त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाचच दोघांचीही बदनामी होईल, काय कराव ? भेटायला जाणं योग्य कि अयोग्य ? जाउदे एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधीही भेटनं तर सोडाच पण साधी ओळखही न दाखवण्याबद्दल खडसावून सांगुया असा विचार मनात पक्का करून नेहल दुसऱ्या दिवशी नीरजला भेटायला जाते.

दुसऱ्या दिवशी नीरज आणि नेहल मुलांना शाळेत सोडून जवळच्याच एका हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी जातात.
इकडच्या-तिकडच्या गप्पा मारताना नकळत त्यांच्या पूर्वीच्या एकमेकांवरच्या प्रेमाचा विषय निघतो. अगदी मनापासून प्रेम असूनही चांगली नोकरी मिळून स्थिरस्थावर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही, अशा केलेल्या निश्चयामुळे आपल्याकडून लग्नाला उशीर झाला आणी तुझ्यावर अशी दुसऱ्या लग्नाची पाळी आली त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला स्वतःलाच जबाबदार धरून तो स्वतः सर्वप्रथम नेहलची माफी मागतो.
पुढे गप्पांच्या ओघात नेहल ची खरी कहाणी कळते, की वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्धच तिच लग्न नात्यातल्याच एका मुलाबरोबर लावून दिल होतं, पण लग्नानंतर साधारण तीन वर्षांतच तिचा नवरा कॅन्सर ने दगावला.

तिला एक मुलगी आहे, घरी सासू आहे, घरी कमावतं दुसर कोणीच नसल्याने तिला कुटुंबाची जबाबदारी नोकरी करून पेलावी लागतेय असं नेहल सांगते. तिची परिस्थिती तशी बेताचीच आहे, त्यामुळे नीरज  – नेहल ला आपल्याच कंपनीत जास्त पगाराचा चांगला नवीन जॉब मिळवून देण्याच प्रॉमिस करतो. 
सुरवातीला नेहल नाही नको असं करत करत शेवटी तयार होते.
पुढे एकाच ऑफिसात काम करत असल्यामुळे रोजच्या भेटण्या-बोलण्यातून पुन्हा एकदा दोघांमध्ये हळुवार मैत्री फुलते.

ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त नंतरही त्याचं एकत्र बाहेर फिरणं, सिनेमा, शॉपिंग या गोष्टी वाढतात.
दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकांचा सहवास आवडू लागतो.
अशातच नीरज एक दिवस नेहलला ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवसांसाठी दुसऱ्या शहरात आपल्यासोबत मिटींगला चालण्याचा आग्रह करतो.
नेहल नाही म्हणते, लहान मुलगी, आजारी सासूची अडचण सांगते.
पण नीरज शेवटी तिला मनवतोच.

मिटींगच्या आदल्या दिवशी दोघेही निघतात आणि रात्री एका हॉटेलवर मुक्कामासाठी थांबतात, फ्रेश होतात आणी गप्पा मारत बसतात. गप्पांच्या ओघात नेहल नीरजला समजावून सांगते कि ‘तू तुझा संसार नीट बघ सांभाळ. हे सर्व आपण  वागतोय ते बरोबर नाही.’
नीरज आता आपली बाजू नेहल ला समजावून सांगतो, ‘हे बघ नेहल, तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पटतंय, पण मला नाही वाटत की मी काही चुकीचा वागतोय. हो, मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतोय हे खरय पण खरं म्हणजे तुझं लग्न होवून तू माझ्यापासून दूर निघून गेल्यामुळे मला इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यात काडीचाही रस नव्हता.

मी माझ्या लग्नाचा विषय नेहमीच टाळत राहिलो, पण लहान भावंडाच्या खोळंबलेल्या लग्नामुळे आणि केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर मला गीतांजली सोबत नाईलाजाने लग्न कराव लागलं. 
पण लग्नानंतर देखील तुझ्या आठवणीमुळे मी मनाने तिला कधीच आपली समजू शकलो नाही. पुढे माझी इकडे पुण्याला बदली झाली, जसजसा मला तुझा विसर पडत गेला तेव्हा मात्र मी हळूहळू तिला स्वीकारायला लागलो. थोड्याच दिवसांत आम्हाला मुलगी झाली आणि आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो.
आता आपण आपली कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवायची नाही या प्रामाणिक विचाराने मी तिला एक दिवस आपल्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल सगळं सांगून टाकलं, तिनेही ते मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं.

नीरज म्हणतो मी मुलीसाठी थांबलो नाहीतर मी गीतांजलीला केव्हाच घटस्पोट घेऊन मोकळा झालो असतो. पण आता मी मुलीच्या प्रेमापोटी गीतांजलीला सोडू शकत नाही. गीतांजलीला ह्या नात्याची तशी थोडी कुणकुण आहे पण माहेरी गरिबी त्यात जास्त शिक्षण नाही त्यामुळे ती बिचारी नाईलाजाने हे सर्व मूकपणे सहन करतेय.
गीतांजली म्हणतेय हे घर नीरजच आहे त्याने मला इथून निघून जा सांगितले तर मी काय करणार त्यामुळे मी सगळ सहन करत त्या घरात राहतेय.
लग्नाला पंधरा वर्ष झाल्यावर नीरजने नेहलची सासू वारली म्हणून हट्टाने नेहलला आणि तिच्या मुलीला कायमचे घरी राहायला आणले. गीतांजली खूप रडली, असं करू नका असं ओरडू लागली नीरजला.

पण नीरजने स्वतःचा अहंकार तिथेही गाजवला.
त्याने कोणाचंच ऐकलं नाही.
गीतांजली अगदीच हतबल झाली होती. रडून दिवस घालवत होती.
चार दिवसांनी तीने ट्रेनखाली उडी मारून स्वतः ला आणि मुलीला संपवले.
अशाप्रकारे नीरज आणि नेहल एकत्र तर आले पण नीरजला आयुष्यभर माझ्यामुळे गीतांजली आणि आपल्या मुलीचा जीव गेला ह्याची खंत लागून राहीली.
त्यामुळे तो नेहल बरोबरसुद्धा कधीच सुखी राहू शकला नाही आणि ह्या प्रेमामुळे तीन व्यक्ती कायमच्या दुःखीच राहिल्या.
*****
हि एक सत्य घटना आहे 
© सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धेमधे सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षीसे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻
माझी लेखणी कथा लेखन स्पर्धा

Leave a Comment

error: Content is protected !!