जाळ्यातील कोळी

©सौ. प्रतिभा परांजपे
अंजली ने पर्स मध्ये लंच बॉक्स व रुमाल ठेवत घड्याळ पाहिले, सकाळचे नऊ वाजले होते आफिसला निघायला अजून दहा मिनिटे  आहेत असे पाहून तिने आईकडे फोन लावला.
बराच वेळ रिंग वाजत होती. खरेतर आई कडेही घाईचीच वेळ असते. दादा , वहिनीलाऑफिसला जायची तर मधुरा आणि मनीषची शाळेची. त्यातून आईची गुडघेदुखी.
बऱ्याच वेळाने हॅलो –असा आईचा आवाज आला.

“आई मी अंजू…”.
“अग पुण्याहून केव्हा आलात? तुझ्या दिरा कडची वास्तु कशी झाली? भाऊजी आणि वहिनी कसे आहेत”? आईला सर्वच ऐकायची घाई.
अगं “आम्ही काल रात्रीच आलो, मी आत्ता ऑफिसला निघते आहे. आज माझा हाफ -डे आहे, तेव्हा मी तीन वाजेपर्यंत घरी पोहोचेन तेव्हा तूम्हीच इकडे या, मग आपण निवांत बोलू.”
ठीक आहे न– म्हणत अंजलीने फोन कट केला, नाहीतर –आईने आत्ताच सगळ्या चौकशा केल्या असत्या.

दुपारी अडीच वाजेपर्यंत मान वर करून पाह्यला उसंत नव्हती. 4 -5 दिवसाचे पेंडिंग काम होते. घराचेही असेच हाल आहेत पण– उद्या रविवार तेव्हा होईलच–असे मनाशी बोलत अंजली निघाली.
ऑफिस मधून घरी येताना तिने आईच्या आवडीचे बेक समोसे घेतले.
साधारण चार च्या सुमारास दारावरची बेल वाजताच अंजलीने दार उघडून आईला आत घेत विचारले” बाबा नाही आले?
“अगं नेहमीचंचच ग, नेमकी आज त्यांच्यी सोसायटीची मीटिंग, सेक्रेटरी ते, सगळी जबाबदारी जणू त्यांचीच  ,सतत आपल्या लष्कराच्या भकर्‍या भाजत बसतात.”

“अगं मग चांगलच आहे की,आई तू पण थोडं सोशल वर्क कर न बाबां सारख. काय नुसतं घर एक घर”
अंजूच्या बोलण्याकडे लक्ष न देता आई म्हणाली “तू सांग वास्तुशांत कशी झाली? दिराचे घर कसे आहे? फ्लॅट आहे कि बंगला?”
“अगं आजकाल फ्लॅटच परवडतो.”
“तुम्ही काय आहेर केला?”
“आम्ही पैसे दिले पाकिटात घालून. कार्यक्रम तर खूपच छान झाला गं, आणि घर ही खूप छान आहे. त्या नंतर आम्ही एक दिवस भर काकूंकडे ही गेलो होतो. केवढा मोठा बंगला आणी अग आई काकूने काय मस्त बाग फुलवली आहे, पुण्याच्या हवेत फुलली ही छान”,  जणूकाही”

“माहित आहे ग,” अंजलीला मध्येच अडवत आई बडबडली” त्यांना काय ग वेळ च वेळ, पैशांचा प्रश्नच नाही आणि जागेची ही कमतरता नाही, इथे आपल्याकडे एक तुळशीची कुंडी ठेवायची तरीही पाणी खालच्या ब्लॉकला न जाईल असे पाहावे लागते.”
आपण किती त्रासात त्यांना किती आराम वगैरे वगैरे आईचे नेहमीच पुराण सुरू  पाहून मग अंजलीने गरम समोसे ,मिल्क केक, चहा असा आईचा आवडता फराळ काढला व काकूने दिलेली साडी वगैरे दाखवत विषय बदलला.
आई बरोबर भाच्यांसाठी खाऊ दिला.
रात्री अजित आईला पोचवायला कारने गेले..

अंजली कपडे घर आवरता आवरता विचार करत होती, आईला काकूचा हेवा वाटतो की काय?
काकूची दोन्ही मुले भारताबाहेर. एक अमेरिकेत तर दुसरा जपानमधे.
काका व काकू  दोघेच पुण्यात राहतात त्यामुळे त्यांना मिळणारा निवांत वेळ, त्यांचे बाहेर फिरणे, मधून मधून विदेश प्रवास या त्यांच्या आनंदाच्या गोष्टी आईला दिसतात, पण मुलांशिवाय येणारे एकटेपण, नातवंडांच्या बाललीला, बोबडे बोल ऐकायला आसुसलेले मन किती कातर होते ते आई ने कुठे कधी अनुभवले आहे?
दोन्ही मुलांची लग्ने होऊन सुना ही तिकडेच गेल्या 

मागे अंजली चे शिक्षण पूर्ण होताच, लग्नाच्या आधी ती काका कडे राहायला गेली होती तेव्हा नुकतेच काकाची दोन्ही मुले अरुण- वरूण परदेशी गेले होते. 
काकूला बरे नव्हते वरून वरून छान दिसायची पण, मधूनच अपसेट व्हायची .
काका अंजली जवळ बोलले ” मुले  बाहेर गेल्याने तिला आपण एकटे पडलो या भावनेने आलेले तिचे हे मानसिक व त्यामुळे आलेल शारीरिक आजार पण आहे. हळूहळूहोईल सवय.”

पण मग मात्र हळूहळू काकूने एकटेपणाची चौकट मोडून काढली व स्वतःला सावरले. बाह्य गोष्टींमध्ये रस घेऊ लागली. बागकाम हा त्यातलाच भाग.
रिकामे राहणे नको कारण घरात रिकामे राहिले की मग आठवणींचा भुंगा मन कुतरतो म्हणून मग लेडीज क्लब, जिम, गाण्याचे कार्यक्रम, बाल व वृद्धाश्रमाला भेटी देणे असे करत स्वतःला सावरले.
अंजलीच्या लग्नात काकूने तब्येत व मन दोन्ही सावरले. तरी दादा, वहिनी ,मधुरा, मनीषला पाहून तिचे मन परत हेलावले.
त्या आठ दिवसात मग तिने या नातवंडांचे कौतुक करून आपली भूक भागवली .

लग्नात सर्वांना भरपूर भेटीही दिल्या आईला हे सर्व प्रदर्शन वाटत होते.
“अहो- दोन-चार दिवस छानच वाटेल” असे तिने काकूला सुनावले.
आईला स्वतःजवळ असलेली मायेची संपत्ती कवडीमोल वाटते व काकूच्या गारगोट्या  हिरे माणकं वाटतात.
अंजलीने अनेकदा आईला समजावून पाहिले, “अग तू ही काकू सारखी थोडी मोकळी होना. जरा बाहेरच्या जगाचा अनुभव घे.  बाबा आणि तू चार दिवस  बाहेर फिरायला कुठे तरी गावाला, देवदर्शनाला जाऊन ये नाही तर काकांकडे तरी जा चार दिवस.”

पण ते तिला जमत नव्हते,  तिने स्वतःला एका चौकटीत बांधून घेतले होते आणि त्यामुळे ती थोडी चिडचिडी झाली होती .
म्हणतात ना” सुख वाटे जवा पाई दुःख डोंगराएवढे “तसेच काहीसे होते.
अंजलीच्या लग्नात झालेल्या दगदगीने आईची तब्येत बिघडली. आठ दिवस वहिनीने सुट्टी घेतली, सर्व घरच आईच्या सेवेस हजर होते. नातवंड पण आजीचे औषध-पाणी पहात तिच्याजवळ बसत. आईला अगदी सर्व हातात आणून देत.
अंजली ही सासरहून परत आली, तीही रोज एक चक्कर लावत होती.

आईला थोडे बरे वाटल्यावर अंजलीने आईला माझ्या घरी चल आरामासाठी असे म्हटले तर,” नाही ग अत्ता तुझा नवा संसार सुरू आहे त्यात मी म्हातारी चे काय काम” असं म्हणून आईने येणं टाळलं.
दादा वहिनी पण म्हणाले, “आई अंजू चा संसार पाहून ये, जावयां कडून कौतुक करुन घ्या.” तेव्हा मग नाईलाजाने कां होईना पण आई तयार झाली.
अंजली आईला आपल्या घरी घेऊन आली. आता आठ दिवस इथेच आराम कर माझी कामवाली बाई ही आहे.

अंजलीने आईच्या करमणुकी साठी तिला टीव्ही वर सिनेमा, गाणी कशी लावायची ते दाखवले, संध्याकाळी बागेत फिरायला घेऊन जायची. सुट्टी च्या दिवशी जावयांनी पिकनिक ला म्हणून कार ने बाहेर फिरवून आणले, येताना बाहेर च जेवणं ही झाले.
पण चार दिवस झाले आणि आईने घरी परतण्याचा हट्ट सुरू केला.
अंजलीने कसेबसे आईचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
“आता तर तुला थोडे बरे वाटते आहे मलाही तुझी थोडी सेवा करू दे आणि वहिनीलाही  स्वतंत्रपणे आपले आपण मॅनेज करू दे. मी तुला इतक्यात घरी जाऊ देणार नाही.”

तेव्हा कसेबसे दोन दिवस आईने आणखीन दम धरला पण मग “अगं, मला आता करमत नाही ग, तिकडे सुनबाईला पण ऑफिस आणि घर दोन्ही संभाळणे जड जात असेल मधुरा अजून लहान आहे ती घरी एकटी” वगैरे वगैरे अशी बरीच कारण पुढे करत आईने घरी जाण्याचा हटृ धरला तेव्हा नाईलाजाने अंजलीने दादाला फोन केला.
हे सर्व पाहून अंजलीला वाटले आईची ही नेहमीची कुरबुर वरवरची आहे, मनातून मात्र ती त्यासर्वातच सुखी आहे.
सतत एका चौकटीत राहून स्वतः नवीन बदल स्वीकारायला तयार नाही. स्वतःभोवती जाळं विणून जग हे एवढेच आहे व सुरक्षित आहे असे मानणारी जाळ्यातली कोळी जणू.
*******
सतत घर संसार संभाळणाऱ्या स्त्रियांना, अचानक काही बदल मनाला पटत नाहीत. खरे तर त्यांनी अधून मधून असे बदल स्वीकाराला हवेत. हे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न, कसा वाटला ते नक्की सांगा.
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!