नशीब

©® सौ. दिपमाला अहिरे
“काय गं सारखी तुझी चिडचिड आणि धावपळ चालू आहे?? तुला उशीर होतोय तर जा तु , मी बघते माझं काय ते” उषाची बारा वर्षांची मुलगी ईशा तिला उलट बोलली म्हणून उषाचा पारा अजुनच जास्त चढला.
“आयुष्यात कधीतरी जरा बाहेर जायचं म्हटलं, कुठल्या मैत्रिणीला भेटावं म्हटलं तर यांच आपलं काहीना काही असतंच मध्ये आणि वर तोंड करून सांगतात कसे तुला जायचं तर जा, आंम्ही बघु आमचं. पण मी म्हणते माझ्याच बाबतीत असं का होतं नेहमी? मला काही काम असलं की,तुमचे ट्युशन, मध्येच काय ते एक्सट्रा क्लास आणि सर्व मलाच मॅनेज करावं लागणार.

बाप तर मस्त बॅग आणि डबा उचलून कामाला निघून जाईल. मला स्वतः चं असं काही आयुष्य,वेळ काही आहे की, नाही?
फक्त घरासाठी राबराब राबत रहावं का मी??” “बरं नवऱ्याचा एवढा पगार नाही की, एखाद्या कामाला बाई तरी ठेवली असती मी? पण नाही ना…लग्नाच्या दहा वर्षांत तीन खोल्यांचे घर काय बांधुन दिले. आयुष्यभर काटकसरीचेच जिणे जगावे लागणार आहे मला. बाकी हौसमौज नको की, फिरणं बिरणं नको..
काही सांगायला गेलं तर , सरळ सांगुन मोकळे होतात घराचे हप्ते आहेत, मुलांचे शिक्षण आहे. सर्व जमवता जमवता इतर अवांतर खर्च आपण करुच शकत नाही. म्हणजे काय आयुष्य मन मारुनच जग तु. असंच सांगायचे असते त्यांना. माझ्याच वाट्याला यायच्या होत्या सर्व गोष्टी!!”
उषाची आपल्या कामांसोबतच बडबड ही चालली होती.

आज तिची बालमैत्रिण एका नातेवाईकांच्या लग्नासाठी योगायोगाने तिच्या शहरात आली होती. म्हणून दोघींनी भेटायचे ठरवले होते. पण उषाची घरची कामं संपतच नव्हती. आणि म्हणूनच तिची जरा चिडचिड होत होती. एकदाची सर्व कामं आटोपून उषा घराच्या बाहेर पडली.
ज्या मॅरेज हॉल मध्ये लग्न होते तिथुन जवळच असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये उषा आणि तिची मैत्रिण सीमा भेटल्या.
बऱ्याच वर्षांनी दोघी भेटल्या होत्या.
सीमाला पाहुन उषाला स्वतः चाच कमी पणा वाटत होता. कारण सीमा तिच्या स्वतः च्या कारने आली होती.

डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या दागीन्यांनी लादलेली होती. साडी ही तशीच भारीतली चार पाच हजारांपर्यंत तरी असेल. तीला न भेटताच निघुन जावे असे उषाला वाटत होते.
सीमा ने उषाला पाहिले आणि आणि घट्ट मिठी मारली.
“उषा अगं किती वर्षांनी भेटतोय आपण? तुझ्या लग्नात आले होते.त्यानंतर भेटच नाही ना आपली? दहा अकरा वर्षै झाली असतील ना? खुप छान वाटलं गं तुला भेटुन. कशी आहेस तु?? तुझी मुलं”
“सर्व छान आहेत. तु बोल तु कशी आहेस?”

“मी पण मस्त, आतेभावाच्या मुलाचे लग्न होते म्हणून यावेच लागले. म्हटलं चला या निमित्ताने तुलाही भेटणं होईल.”
उषा बोलली ” फोर व्हीलर चालवायला केव्हा शिकलीस तु? गाडी छान आहे तुझी.”
” अगं गेल्या महिन्यात ॲनवर्सरी ला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिली मला. आधीची होती पण ती गाडी पाच वर्षे जुनी झाली होती आणि ड्रायव्हिंग तर मला वेळ काढून शिकुन घ्यावं लागलं. कारण नवरा बिझनेसमन आहे. आपल्या कामात बिझी असतो. जास्त तर आऊट ऑफ कन्ट्री असतो. म्हणून मग घरचं सर्व मलाच मॅनेज करावं लागतं. घरात दोन सर्वंट आहेत मदतीला पण मग असं लग्न वगैरे सारखे काही फंक्शन असले तर मलाच जावे लागते. आपल्या सोयीसाठी म्हणून गाडी तर हवीच ना?”

सीमा बऱ्याच वेळ आपल्या श्रिमंतीच्या गप्पा मारत होती आणि उषा फक्त ऐकत होती. “उषा तुझे मिस्टर काय करतात?”
“माझा नवरा सरकारी नौकर आहे. एका बॅंकेत क्लर्क आहे ,दोन मुलं आहेत.” उषाने आपले बोलणे कमी वेळात आटोपले.
ती मनातच आपली आणि सीमाची तुलना करत होती.
मी साधा दोनचारशे रुपयांचा सेल मधुन आणलेला कुडता घालुन मिरवत आली होती. की माझा ड्रेस नवा आहे या विचाराने.. पण सीमाच्या चार हजारांच्या साडी पुढे तर हा दिसतही नाही.

कॉफीचे बील ही सीमानेच दिले. त्या बिलाच्या डबल तर तिने वेटरला टिपच देऊन टाकली.
पैसा आणि श्रिमंतीचे तेज आणि आत्मविश्वास सिमाच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता.
सीमा आपल्या कारने गेली आणि उषा रीक्षा करुन घरी परत आली.
तिच्या डोळ्यासमोरून सीमा मात्र जातच नव्हती.
त्याच विचारात असताना इशा ने तिला विचारले, ” मम्मी भेटली का तुझी फ्रेंड? तिला घरी आणलं असतं ना? आंम्ही ही भेटलो असतो ना मग?”

उषाचा पारा परत वाढला “कशाला बोलवु तिला आपल्या या खुराड्या सारख्या घरात? आपल्या किचन पेक्षा तर तिची गाडी मोठी आहे. दोन दोन नौकर आहेत तिच्या हाताखाली. एवढ्या श्रीमंत बाईला कशी बोलावु आपल्या घरात? मला नावं ठेवायला का?
माझेच नशीब फुटके आहे. आई वडिलांनी लग्नाची घाई केली नसती तर कमीतकमी अजुन शिकुन मी स्वतः च्या पायावर उभी राहिली असती तर आज कदाचित माझी अशी परिस्थिती नसती.” 
उषाला आपल्या बालपणाची आठवण झाली जेव्हा ती आणि सीमा दोघीही शाळेत एकत्र होत्या.. आणि पुढे एकाच कॉलेजात होत्या. दोघी जिवाभाच्या मैत्रिणी होत्या त्यावेळी.पण तरीही आज सीमाला पाहुन उषा मात्र थोडीफार का असेना तिच्यावर जळत होती.

स्वतः ची तुलना तिच्याशी करत होती. ही सीमा जेव्हा शाळेत होती.आभ्यासात  किती “ढ” होती, अक्षर किती खराब होते हिचे त्यामुळे रोजच बाईंच्या हातचा मार खायची ही..गणितातलं तर अजिबात काही येत नव्हते हिला. सारखी मलाच त्रास द्यायची ही एवढं गणित सोडवुन दे ना. आभ्यासाचा प्रचंड कंटाळा होता हिला.. पुढे तर अकरावीत मी सायन्स घेतले म्हणून हिला सुद्धा तेच घ्यायचे होते.
पण तिच्या बाबांनी तिला आर्ट शाखेत टाकले. माहित होते ना त्यांना त्यांच्या मुलीला आभ्यासात जराही रस नाही ते.. तिला फक्त नट्टापट्टा करुन मिरवायला आवडायचं.. दुसरं कसलं ही ज्ञान नव्हतं हिला.. दिसायला जरा चांगली म्हणून हिला चांगल्या श्रिमंता घरचं मागणं आलं.

म्हणून आज ही एवढी कौतुकाने सारा दिखावा करते.. खरं आहे पण.. हुशारी काही कामाची नसते.. नशीबाने पण साथ दिली पाहिजे बाई… नाहीतर माझ्यासारखं परीस्थितीच्या नावाने आयुष्यभर  असं रडत बसावं लागतं. सिमाचे नशीब मात्र खरोखर जोरावर आहे. आज सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत आहे..तिचा जणु जन्मच सार्थकी लागला म्हणावे लागेल.
उषाच्या डोक्यातले विचारचक्र काही केल्या थांबत नव्हते  तेवढ्यातच  दारावरची बेल वाजली.
बाजुची नेहा पेढ्यांचा पुडा घेऊन आली होती. उषाच्या हातात पेढा ठेवत ती पाया पडली.
“नेहा कसला गं पेढा?”

“उषा ताई आमच्या ह्यांना नौकरी लागली. इतकी वर्षे घरीच शिकवण्या घेत होते. वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा ही देत होते. एका शाळेतुन कालच जॉईनींग लेटर आले. पगार कमी आहे, पण ठिक आहे. परमानंट नौकरी मिळाली तेच पुरे आहे.”
उषा तिच्या कडे आश्चर्याने पहात होती.
” नेहा, पण तुला पाहुन तर कधीच वाटलं नाही की, तुझा नवरा नौकरीला नाही ते. तु नेहमीच हसतमुख आणि आनंदी दिसतेस. घरात अडचण असेल असे तुला पाहुन कधीच कुणाला भासतंही नाही. हे कसं काय??”
यावर नेहाने जे उत्तर दिले त्यातच उषालाही आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.

नेहा म्हणाली, “कारण मी समाधानात सुख मानते. जे नाही त्या गोष्टींसाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानलं तर आयुष्य आनंदी असतंच ना आणि आपल्या कडे काय कमी आहे हे लोकांना सांगत बसण्यापेक्षा जे आहे तेच तर सुख आहे असाच विचार करते मी.
आता बघा ना प्रेम करणारा, काळजी घेणारा नवरा, गोड मुलगी आहे.यापेक्षा दुसरे सुख काय असते बरं? तेच तर असते ना आपली आयुष्य भराची कमाई? आणि दुसऱ्यांच्या नशीबाचा कींवा परिस्थिती चा हेवा करण्यापेक्षा आपल्या कडे काय आहे तेच आपण पाहिले तर समाधान आणि सुख मिळतेच की, आपल्याला. पण माणुस काय करतो जे मिळालं नाही त्यासाठी कुढत बसतो. जे मिळालं आहे त्याला मात्र विसरुन जातो.

 याओळी तुम्ही कधीतरी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील बघा..
‘मिलता तो बहुत कुछ है जिंदगी में
बस हम गिनती उसीकी करते जो हासील ना हो सका!”
©® सौ. दिपमाला अहिरे
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
आली माझ्या घरी ही दिवाळी
दीप उजळले आनंदाचे
साकव

Leave a Comment

error: Content is protected !!